भंडारा पत्रिका/प्रतिनिधी गोंदिया : कुठल्याही भीतीने अथवा कुठल्याही लालसेपोटी आम्ही युती सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला नाही. राज्य व जिल्ह्याच्या विकासाला गती मिळावी, शेतकरी, सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी सत्तेत सहभागी झालो. त्यामुळे विरोधक आरोप करून दिशाभूल करण्याचा प्रयत्न करीत आहेत. पण कार्यकर्त्यांनो तुम्ही या टीकेकडे दुर्लक्ष करा, तुमचे लक्ष केवळ जिल्ह्याच्या विकासाकडे केंद्रित करून सर्वसामान्यांचे प्रश्न मार्गी लावा, असा सल्ला खा. प्रफुल्ल पटेल यांनी गुरुवारी (दि. २४) गोंदिया येथे आयोजित राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्ता मेळाव्यात दिला. गोंदिया जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने गुरुवारी स्थानिक नमाद महा- विद्यालयाच्या सभागृहात कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता, यावेळी ते बोलत होते.
पटेल म्हणाले, गोंदिया व भंडारा जिल्हा व राज्याच्या विकासासाठी आम्ही सत्तेत जाण्याचा निर्णय घेतला. भंडारा व गोंदिया जिल्हा म्हणजे माझे कुटुंब आहे. या कुटुंबात कोणावरही अन्याय होणार नाही. शेतकºयांच्या शेतमालाला योग्य भाव मिळावा, जिल्ह्यात सिंचनाच्या सोयीसुविधा उपलब्ध व्हाव्यात, शेतकरी व शेतमजूर सक्षम व्हावा, समाजातील सर्व घटकांचा सर्वांगीण विकास करण्याची जबाबदारी आमची आहे. काहीही झाले तरी राष्ट्रवादी काँग्रेसच्या मूळ विचारधारेशीकधीही तडजोड करणार नाही. फुले, शाहू, आंबेडकरांच्या विचारधारेवरच पक्षाची यापुढे वाटचाल कायम राहील, अशी ग्वाही पटेल यांनी दिली.