भंडारा पत्रिका / प्रतिनिधी मोहाडी : तालुक्यातील नागरिकांच्या समस्या जाणून घेत त्याचे निराकरण करण्यासाठी आ. राजू कारेमोरे यांच्या जनता दरबाराचे आयोजन तहसील कार्यालय मोहाडी येथे ४ सप्टेंबर रोजी करण्यात आले होते. यावेळी जनता दरबाराच्या माध्यमातून मतदारसंघातील नागरी कांनी आपल्या अनेक समस्या मांडून काही सूचनाही केल्या. जनता दरबारात आमदार राजू कारेमोरे यांच्या समक्ष त्यांच्या मतदार संघातील शासनाच्या विविध विभागाशी संबंधीत समस्या सर्वसामान्य नागरिकांनी मांडल्या. यापैकी ज्या समस्या ताबडतोब सुटणे शक्य होते, अशाच्या बाबतीत तत्काळ निर्णय घेण्याचे निर्देश आमदारांनी उपस्थित अधिका-यांना दिले. तर काही समस्या योग्य चर्चा करून निकाली काढण्याच्या सूचना दिल्या. शासनाच्या योजनेपासून कुणीही वंचित राहू नये, यासाठी काळजी घेण्याचेही आ.कारेमोरेंनी सांगितले. जनता दरबारात तहसीलदार, गटविकास अधिकारी, गटशिक्षणाधिकारी, वन, कृषी, पोलिस, भुमी अभिलेख, ऊर्जा, जलसंधारण विभागाचे अधिकारी उपस्थित होते.