भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गोंदिया : शासनाच्या सार्वजनिक वितरण प्रणालीद्वारे स्वस्त धान्य दुकानातून शिधापत्रिकाधारकांना दर महिन्याला धान्याचे वाटप केले जाते. पुर्वी हे धान्य वितरीत करण्यात येत असलेल्या महिन्यात घेतले नसल्यास पुढच्या महिण्याच्या सात दिवसांत धान्य घेण्याची मुभा लाभार्थ्याला होती, मात्र आता ही मुभा बंद करण्यात आली आहे. त्याच महिन्यात संबंधित व्यक्तीने आपले धान्य संबंधित राशनच्या दुकानातुन घेऊन जावे, असा निर्णय अन्न व नागरी पुरवठा विभागाने घेतला आहे. या निर्णयामुळे उर्वरित अन्न धान्याचा होणारा काळा बाजारावर प्रतिबंध लागणार असल्याचे बोलले जात आहे. शिधापत्रिकाधारकांना राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेतून प्रति व्यक्ती २ किलो गहू व ३ किलो तांदूळ देण्यात येते. गोंदिया जिल्ह्यात २ लाख ४२ हजार पेक्षा अधिक शिधा पत्रिकाधारक आहेत. या शिधापत्रिका धारकांना तब्बल ९९९ प्राधिकृत धान्य दुकानातुन दर महिन्याला धान्याचे वितरण केले जाते. मात्र एकाच वेळी लाभार्थी धान्य घेऊन जात नसतात, त्यामुळे त्या लाभार्थ्यांना पुढील महिन्याचा ७ तारखेपर्यंत राशन दुकानातुन धान्य घेऊन जाण्याची मुभा होती. लाभार्थी धान्य घेऊन जाण्याचे चुकले तरी त्याला पुढील ७ तारखेपर्यंत मागील व तसेच चालू महिन्याचे धान्य देण्यात येत असे. शिल्लक धान्याचा साठा तसेच अतिरिक्त धान्याचा साठा यांची बेरीज वजाबकी करण्याचे काम यापूर्वी रेशन विक्रत्यांना करावे लागत असे. याचा गैरफायदा घेऊन यातून संबंधित स्वस्त धान्य दुकानदार काळाबाजार करण्याची शक्यता होती.
शिल्लक धान्याची विक्री करणे बंधनकारक असल्यामुळे त्या शिल्लक धान्याचा सर्व हिशोब तालुक्याच्या अन्न धान्य वितरक अधिकाºयासह जिल्ह्याच्या पुरवठा अधिकाºयाला देणे बंधनकारक होते. त्यावेळी संबंधित अधिकाºयांना अडचणी निर्माण होत असल्याचे लक्षात आले होते. घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय बैठकीमध्ये स्वस्त धान्य वितरणातील त्रुटी बाबत चर्चा करण्यात आली. चालू महिन्यात लाभार्थ्यांचे धान्य घेण्याचे राहिले असल्यास ते धान्य घेण्यासाठी पुढील महिन्याच्या ७ तारखेपर्यंत मुभा देण्याच्या ऐवजी त्याच महिन्यात धान्य घेण्याची सक्ती करण्यात आली आहे. यामुळे धान्याचा होणारा काळाबाजार रोखता येणार असल्याचे म्हटले जाते. प्रायोगिक तत्वावर काहि जिल्ह्यांमध्ये सप्टेंबर महिण्यापासून या निर्णयाची अंमलबजावणी सुरु झाली आहे. तर येत्या काळात सरकारने त्याची अंमलबजावणी कायमस्वरूपी सर्व जिल्ह्यात करण्याचे ठरवले आहे. त्याबाबत एक परीपत्रक जारी केले आहे. या निर्णयामुळे शिल्लक धान्याचा प्रश्न निकाली लागणार आहे. असे झाल्यामुळे संबंधित महिन्याचे वितरण वाढून ग्राहकांना ज्या महिन्याचे धान्य त्याच महिन्यात घेऊन जाण्याची सवय लागणार आहे.