भंडारा पत्रिका / प्रतिनिधी अर्जुनी मोरगाव : गेल्या वर्षभरापासून अजुर्नी मोरगाव तालुक्यात रानटी हत्तीचा धुमाकूळ सुरू आहे. रानटी हत्तीचा हा कळप १२ डिसेंबर रोजी रात्री १२ वाजताच्या सुमारास कुरखेडाकडून तालुक्यातील बाराभाटी परिसरात दाखल झाला. या कळपाने पोल्ट्री फार्म, पॅक हाऊसची तोडफोड केली असून ३०० पोते धानाची नुकसान केले आहे. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण आहे. मागील शनिवारी ९ डिसेंबर रोजी वीस ते पंचवीस हत्तीचा कळप गडचिरोली जिल्ह्यातून कुरखेडावरुन नागणडोह मार्गे तालुक्यात दाखल झाला होता. ९ डिसेंबरच्या रात्री राजोली, भरनोली येथील नीलकंठ हारमी यांच्या शेतातील ५ एकरातील धानाच्या पुंजन्याची नासधुस करून हा हत्तीचा कळप पुन्हा गडचिरोली जिल्ह्यात परतला. मात्र १२ डिसेंबर रोजी हत्तीचा कळप कुरखेडा मार्गे प्रतापगड काडीमाती जंगल परिसरातून थेट तालुक्यातील बाराभाटी परिसरात दाखल झाला. या कळपाने बाराभाटी येथील शेतकरी पुराणलाल बेलखोडे, भोजराज बेलखोडे यांचे पॅक हाऊस व गांडूळ खत इमारतीची पूर्णत: नासधूस केली असून या इमारतीमध्ये ठेवलेले ३०० धानाच्या पोत्याचे नुकसान केले. तसेच गौरव दादाजी बेलखोडे यांच्या शेतात असलेल्या पोल्ट्री फार्मची तोडफोड करुन १९ धानाचे पोते उध्वस्त केले, केळीचे झाडांची नासधुस करून दहा नारळाचे झाडे सुद्धा जमीनदोस्त केली आहे. तसेच हेमराज बेलखोडे, किशोर बेलखोडे, महेश बेलखोडे, भागवत बेलखोडे यांच्याही धानाच्या पोत्यांचे नुकसान करून शेतातील पोपट, हळद, मिरची, तूर व उन्हाळी पºह्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले.
घटनेची माहिती मिळताच राज्याचे माजी सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांनी नुकसानग्रस्त परिसरांची पाहणी करून शेतकºयांना दिलासा दिला. तसेच तहसीलदार व वन विभागाच्या अधिकाºयंना भ्रमणध्वनीद्वारे माहिती देऊन तात्काळ नुकसानीचे पंचनामे करून त्वरित मदत देण्याची सूचना केली. यावेळी भाजपा तालुका महामंत्री लैलेश्वर शिवणकर, बाजार समितीचे संचालक व आदिवासी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेचे उपाध्यक्ष व्यंकट खोब्रागडे, उपसरपंच किशोर बेलखोडे, नरेश खोब्रागडे, सरपंच भीमराव चर्जे, हिवराज औरासे व जवळपासचे शेतकरी उपस्थित होते. घटनेची माहिती मिळताच तहसीलदार अनिरुद्ध कांबळे, नवेगावबांध प्रादेशिकचे वनपरिक्षेत्र अधिकारी एस. जी. अवगाण, क्षेत्र सहाय्यक व्ही. एम. करंजेकर, बीटरक्षक व्ही. एल. सयाम, वनमजूर एस. टी. राणे, नवेगावबांधचे क्षेत्र सहाय्यक एल. व्ही. बोरकर हे घटनास्थळी दाखल झाले व त्वरित नुकसानीचे पंचनामे तयार केले. तालुक्यात हत्तीच्या कळपापासून नागरिकांना सजग राहण्याचे आवाहन करण्यात आले. बाराभाटी शेतशिवारात नासधुस केल्यानंतर हत्तीचा कळप कवठा, बोळदे, काळीमाती परिसरातील जंगलाकडे गेले असल्याची माहिती वन विभागाने दिली आहे.