भंडारा पत्रिका / प्रतिनिधी अर्जुनी मोरगाव : तालुक्यात बुधवारी शिरलेल्या हत्तीच्या कळपाने दुसºया दिवशीही १३ डिसेंबर रोजी रात्रीला धुमाकूळ घातली. बुधवार, रामघाट येथील आदिवासी कुटूंबातील तिघांचे जीव प्रसंगावधानाने वाचले असले तरी त्यांच्यासह इतरांच्या घराचे व पिकांचे मोठे नुकसान झाले. गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा मार्गे तालुक्यात हत्तीच्या कळपाने १२ डिसेंबर रोजी पुन्हा प्रवेश केला. बाराभाटी परिसरात धुमाकूळ घालून शेतपीक व धानाचे नुकसान केल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. असे असताना १२ डिसेंबर रोजी रात्री साडेदहा वाजताच्या सुमारास रामघाट येथे हत्तीचा कळप दाखल झाला.
गावातील योगराज श्रावण उईके, त्याची आई शिशुकला व पुतण्या तेजस हे झोपलेले असताना कळप त्यांच्या घरपरिसरात शिरले व घराशेजारी मळणी करुन ठेवलेल्या ९५ धान पोतत्यांचे नुकसान केले. यात योगराज उईके यांचे ६४ तर ज्ञानेश्र कुंभरे यांचे ३० धानाचे पोते होते. त्यानंतर हत्तीच्या कळपाने आपला मोर्चा योगराजच्या घराकडे वळविला. घरात शिरून साहित्याची नासधूस केली. घरात शिरलेल्या हत्तींना पाहून तिघांनी घराच्या धाब्यावर चढून आश्रय घेतला. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. दरम्यान योगराज यांनी मोबाईलवरुन भावाला घटनेची माहिती दिली व काही वेळात वनविभागाची चमू घटनास्थळी पोहाचली. त्यांनी तिघांनाही खाली उतरविले. तसेच या कळपाने गावशिवारातील शेतातील पीकाचे मोठे नुकसान केले.