भंडारा पत्रिका / प्रतिनिधी मुंबई : मंत्री छगन भुजबळ आणि मनोज जरांगे पाटील यांच्यात आरक्षणाच्या मुद्यावरून शाब्दिक युद्ध रंगले आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी देखील शिंदे सरकारने दिलेल्या आरक्षणाला विरोध दर्शवला. अशातच उद्या राज्यभरात ओबीसी आरक्षण बचावचे निवेदन द्या, असे आवाहन भुजबळांनी केले आहे. ते म्हणाले की, सरकारच्या बेकायदेशीर व अन्यायकारक निर्णया विरोधात उद्या आपल्याला संपूर्ण महाराष्ट्रभरातून एकमुखाने आवाज उठवायचा आहे, या निर्णयाविरोधातील आपला रास्त संताप संविधानिक मार्गाने दाखवून द्यायचा आहे. सोशल मीडियावर एक प्रसिद्धी पत्रक जारी करत भुजबळांनी ही माहिती दिली. “मराठा समाजाचे सरसकट ओबीसीकरण करण्यासाठी सरकारने घेतलेल्या अन्यायकारक निर्णयाविरोधात उद्या आपल्याला संपूर्ण महाराष्ट्रभरातून एकमुखाने आवाज उठवायचा आहे, या निर्णयाविरोधातील आपला रास्त संताप संविधानिक मार्गाने दाखवून द्यायचा आहे. ओबीसींसह सर्वच मागासवर्गीय जाती-जमातींच्या बांधवांनी व संघटनांनी उद्या गुरुवार दि. १ फेब्रुवारी २०२४ रोजी सकाळी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी आणि तहसीलदारांना ओबीसी आरक्षण बचाव संदभार्तील मागण्यांचे निवेदन सुपूर्द करावे”, असे भुजबळ यांनी सांगितले.