
भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : भंडारा नगर परिषदेच्या प्रभाग क्र.१२ मधील १ व प्रभाग क्र.१५ मधील १ अशा दोन जागांसाठी २० डिसेंबरला मतदान होणार असुन प्रचाराला वेग आला आहे.दरम्यान भाजप नेते आणि आमदार परिणय फुकेने यांनी प्रचार सभेत ‘बटोंगे तो फसोगे’ असा नवा नारा देत इतर पक्षांच्या दिशाभूल करणाºया आश्वासनांना आणि बनावट उमेदवारांना फसवू नका असे आवाहन केले. मात्र आमदार फुके यांचे हे वक्तव्य भडकाऊ असून जातीय आणि धार्मिक तेढ निर्माण करणारी असल्याचा आरोप करीत निवडणूक आयोगाने याची गंभीर दखल घेऊन योग्य ती कारवाई करावी अशी मागणी माजी आमदार तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे (शप) जिल्हाध्यक्ष चरण वाघमारे यांनी पत्रकार परिषदेतून केली आहे. न्यायालयीन प्रकरणांमुळे निवडणूक स्थगित झालेल्या नगरपालिका अध्यक्ष व सदस्य पदांसाठी २० डिसेंबरला मतदान होणार आहे.
भंडारा नगर पालिका क्षेत्रातील दोन प्रभागांमधील दोन गटाची निवडणूक पुढे ढकलली होती. भाजप नेते आमदार फुके यांच्या एका वक्तव्यानंतर मात्र राजकीय वातावरण आणखीनच तापले. विकासासाठी भाजपाच्या उमेदवाराला विजयी करा, असे आवाहन भाजपा नेते परिणय फुके यांनी केले आहे. ‘बटोगे तो फसोगे’, असा नवा नारा देत इतर पक्षाच्या प्रलोभनाला बळी पडू नका, असेही त्यांनी सांगितले. भंडारा शहरातील प्रभाग क्रमांक १२ मध्ये एका नुक्कड सभेला संबोधित करताना ते म्हणाले की पाणीपुरवठा योजना या प्रभागात आणण्यासाठी, शुद्ध पाणी गार्डन, गटर लाईन तसेच प्रभागाच्या विकासासाठी भाजप उमेदवाराचा विजय सुनिश्चित करणे आवश्यक आहे. पक्षविरोधी कारवाया करणाºया इतर पक्षांकडून निवडणूक लढवणाºया उमेदवारांवरही त्यांनी जोरदार टीका केली. भाजपच्या या नवीन घोषणांमुळे भंडारा राजकारणात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
दरम्यान आज पत्रकार परिषद घेत राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष चरण वाघमारे यांनी आमदार फुकेंच्या या वक्तव्यावर तीव्र आक्षेप नोंदवला. ते म्हणाले की, शहरात आणि या प्रभागात प्रभाग १२ मध्येही कुणबी आणि तेली समाजाचे चांगले संबंध आहेत. मात्र भाजपने विधानसभा निवडणुकीच्या वेळी देखील हीच खेळी खेळली होती. जातीय आणि धार्मिक तेढ निर्माण करण्याचे काम भाजप करत आहे. भाजप नेते आमदार परिणय फुके यांनी केलेल्या ‘बटोगे तो फसोगे’ या विधानाचा नेमका काय अर्थ आहे. प्रभाग १२ मध्ये तीन कुणबी तर २ तेली उमेदवार आहेत. त्यामुळे अशा प्रकारच्या वक्तव्याने केली कुणबी असा जातीयवाद निर्माण होऊ शकतो असे चरण वाघमारे म्हणाले. पुढे बोलताना ते म्हणाले की, संत तुकाराम महाराजांच्या गाथा/अभंग काही मनुवादी लोकांनी इंद्रायणी बुडवल्या होत्या मात्र तुकारामांची गाथा संत जगनाडे महाराज यांनी लिहून काढली. त्यामुळे आजही संत तुकारामांचे अभंग आणि गाथा आम्हाला वाचायला मिळतात. यावरूनच कळते की कुणबी आणि तेली या समाजाचे अत्यंत सौख्याचे संबंध आहेत. मात्र अशा प्रकारच्या वक्तव्यामुळे जातीय तेढ निर्माण होण्याची दाट शक्यता आहे या गंभीर बाबीकडे निवडणूक आयोगाने लक्ष घालून योग्य ती कारवाई करावी अशी मागणीही चरण वाघमारे यांनी पत्रकार परिषदेतून केली.यावेळी राकॉं श.प. पक्षाचे शहर अध्यक्ष मधुकर चौधरी, चंद्रशेखर भिवगडे,गितेश ठोंबरे आदि उपस्थित होते.