
भंडारा पत्रिका / प्रतिनिधी नागपूर : मध्यवर्ती बसस्थानकावर आॅटो उभे करुन प्रवाशांना आटोत बसल्यानंतर हातचलाखी दाखवून प्रवाशांचे दागिने आणि पैसे लुटणाºया टोळीचा छडा गणेशपेठ पोलिसांनी लावला आहे. या टोळीला उत्तरप्रदेश, दिल्लीतून अटक केली असून त्यांच्याकडून सोन्याच्या दागिन्यांसह १६ लाख ७५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या टोळीने चोरलेल्या मुद्देमालांमध्ये ४० तोळे सोन्याच्या दागिन्यांचा समावेश आहे. सावज हेरत सराईतपणे चोरी करणाºया या टोळीत परराज्यातील आणखी दोन सराईत चोरांचा समावेश आहे. चोरीच्या एका प्रकरणात गणेशपेठ पोलिसांनी शंभराहून अधिक सीसीटीव्ही फुटेज तपासले. यातला एक जण गणेशपेठ पोलिसांच्या पथकाला बसस्थानक परिसरात घुटमळताना दिसला. त्याला ताब्यात घेत चौकशी केली असता त्याने दिलेल्या माहितीवरून पोलिसांना या टोळीचा उलगडा झाला.
सहाय्यक फौजदार समिर शेख, पवन मालखेडे यांनी बिजनौर आणि दिल्ली शहरातून आरोपींचा सुगावा लावला. प्रवाशांना लुटणाºया या टोळीने आतापर्यंत गणेशपेठ हद्दीतील दोन, पाचपावलीआणि नंदनवन येथून एक अशा चार जणांना लुटल्याचे तपासातून समोर आले. या टोळीची मोडस बघता या टोळीने कोटींपेक्षा जास्त रकमेचे सोने लुटल्याची शक्यता आहे. गणेशपेठ पोलिस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाचे पोलिस निरीक्षक पांडूरंग जाधव, विजेंद्र नाचण, सहाय्यक फौजदार समिर शेख यांच्या पथकाला टोळीची माहिती मिळाली. इम्रान उफर् सोनू एजाज खान (४१), रा लोधीपूरा, जुना जेलखाना, शाहदद खान हबीब खान (२८) रा. गौसिया कॉलनी, अब्दुल नदीन नईम शेख (२८), रा. बाराखोली, आसीम अहमद जमीर अहमद (४२) आणि रविंद्रकुमार उफर् दालू भूरे सिंग (५०) दोघेही रा. मकसूद तनपूर, जि. बिजनौर अशी गणेशपेठ पोलिसांनी अटक केलेल्या आॅटो लूट टोळीतील सदस्यांची नावे आहेत. यातला इम्रान, शाहदद आणि अब्दुल हे तिघेही आॅटोचालक आहेत. तर बिजनौरचे दोघे सराईत चोर आहेत. या टोळीतले आणखी सराईत चोर बिजनौर आणि दिल्लीतील असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.