
भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : पत्रकारीता लोकशाहिचा चौथा स्तंभ असून यात पत्रकारांची महत्वाची भुमीका असते. पत्रकार आपल्या लिखाणातून आरसा दाखवतो. समाजाला दिशा व देशाला सशक्त करण्यासाठी पत्रकारीतेच्या माध्यमातून पत्रकारांची महत्वाची भुमीका असते. असे प्रखर मत भंडारा जिल्हा पोलीस अधिक्षक नुरूल हसन यांनी पत्रकार दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात मांडले. भंडारा जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने ६ जानेवारी रोजी बाळशास्त्री जांभेकर यांनी मराठीतील पहिले नियतकालिक दर्पण सुरू केले. त्याचे स्मरण म्हणून पत्रकार भवन येथे दर्पण दिन म्हणजेच पत्रकार दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा पोलीस अधिक्षक नुरूल हसन होते. तर प्रमुख उपस्थितीत भंडारा जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष चेतन भैरम, सचिव मिलींद हळवे, कोषाध्यक्ष डी.एफ.कोचे, उपाध्यक्ष राकेश चेटूले, वरिष्ठ पत्रकार गोपालकृष्ण मांडवकर, शशी वर्मा, हिवराज उके आदी मान्यवर होते. कार्यक्रमाची सुरूवात बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पुजन करून द्विप प्रज्वलन करून करण्यात आले. त्यानंतर प्रास्ताविक भाषणातून चेतन भैरम यांनी पत्रकार दिनाचे महत्व सांगून काळानुरूप पत्रकारांनी बदलावे, असा सल्ला दिला. मार्गदर्शन करताना वरिष्ठ पत्रकार हिवराज उके यांनी देशामध्ये पत्रकारांची गळचेपी होत असून अनेक समस्यांचा सामना पत्रकार बंधू करीत असल्याची खंत व्यक्त केली. तर गोपालकृष्ण मांडवकर यांनी देशाच्या स्वातंत्र्यात दर्पण सारख्या वृत्तपत्राचे योगदानाबद्दल सविस्तर माहिती देवून पहिलेची पत्रकारीता व विद्यमान काळातील पत्रकारीतेबद्दल रोखठोक मत मांडले.