
भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : कारधा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील ‘आश्रय’बाल सुधार गृहातून तीन अल्पवयीन मुलींनी पलायन केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेने संपूर्ण प्रशासकीय यंत्रणेत खळबळ उडाली आहे. याच सुधारगृहातून यापूर्वीही मुलींनी सुरक्षा भिंत ओलांडून पळ काढला. यामुळे बाल सुधारगृहाच्या कारभाराविषयी आणि सुरक्षा यंत्रणेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून कारधा पोलीस मुलींचा शोध घेत आहेत. विविध गुन्ह्यांमध्ये दाखल असलेल्या अल्पवयीन मुला-मुलींना अटक करता येत नसल्याने पुढील कायदेशीर कारवाई होत नाही, अशा बाल गुन्हेगारांना सुधार गृहात ठेवले जाते.
भंडारा तालुक्यातील आमगाव येथे असे आश्रय बालसुधारगृह आहे. या बालसुधारगृहात २५ मुले-मुली राहतात. काही गंभीर प्रकरणांमध्ये गुन्हे दाखल असलेल्या किंवा विविध गैरप्रकरणातून सुटका करून आणलेल्या १८ वर्षांखालील मुलामुलींना येथे आश्रय दिला जातो. दरम्यान १ फेब्रुवारी रोजी रात्रीचे जेवण झाल्यानंतर सर्व मुली आपापल्या खोलीत झोपण्यासाठी गेल्या. मध्यरात्रीच्या सुमारास सर्वजण तीन मुलींनी सुरक्षा भिंत ओलांडून सुधार गृहातून पळ काढला. दुसºया दिवशी यातीन मुली सुधार गृहात नसल्याचे पाहून प्रशासन खळबळून जागे झाले. तिघींचाही शोध घेण्यात आला मात्र त्यांचा कुठेही पत्ता लागला नाही त्यानंतर कारधा पोलिसात या संबंधित तक्रार दाखल करण्यात आली. तक्रार दाखल होताच ठाणेदार गोकूल सुर्यवंशी यांचे मार्गदर्शनात पोलीस हवालदार कांचन टेंभूर्णे, विकास जाधव यांनी तत्काळ घटनास्थळी जाऊन पाहणी करून पळून गेलेल्या मुलींचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे. या घटनेमुळे पालकांत चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.