
भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : जिल्ह्यातील मोहाडी येथील बहुजन हिताय शिक्षण संस्थेद्वारा संचालित विक्तुजी कॉलेज आॅफ आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स मधील शिष्यवृत्ती लाटण्याचा घोळ पुढे आला आहे. माजी विद्यार्थ्यांच्या कागदपत्रांचा वापर करून शिष्यवृत्ती हडपण्याचा प्रयत्न अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या आंदोलनानंतर फसला व महाविद्यालयाने ते शिष्यवृत्ती विद्यार्थिनीला परत केली. परंतु शासन व विद्यार्थिनीची फसवणूक करणाºया महाविद्यालय व संस्थेवर कारवाई करण्याची मागणी अभाविपने केली आहे. विक्तुजी कॉलेज आॅफ आर्ट कॉमर्स अँड सायन्स या मोहाडी येथील महाविद्यालयात कशिश घुघूस्कर या विद्यार्थिनीने २९ जुलै २०२३ पासून ३० एप्रिल २०२४ पर्यंत बीएससी प्रथम वर्षाचे शिक्षण घेतले. आॅगस्ट २०२४ मध्ये महाविद्यालय प्रवेश रद्द करण्यासाठी तीने अर्ज केला होता.
त्यानुसार १५ आॅक्टोबर २०२४ रोजी विद्यार्थिनीला दाखल्याची मूळ प्रत (टीसी) परत देण्यात आली. द्वितीय वर्षासाठी विद्यार्थिनीने दुसºया महाविद्यालयात प्रवेश घेतला. सध्या तृतीय वषार्ला नवीन महाविद्यालयात शिक्षण घेत असताना प्रवेश घेतलेल्या महाविद्यालयाकडून शासनाच्या द्वितीय वर्षातील शिष्यवृत्तीसाठी अर्ज दाखल केला असता शासकीय दस्ताऐवजा वरून पूर्वी शिकत असलेल्या विक्तुजी कॉलेज आॅफ आर्ट कॉमर्स अँड सायन्स या महाविद्यालयाने सुद्धा सदर विद्यार्थिनीचा शिष्यवृत्ती चा अर्ज भरल्याचे स्पष्ट झाले.महाविद्यालय सोडून गेल्यानंतरही शिष्यवृत्तीचा अर्ज भरला व विद्यार्थिनीची मिळणारी शिष्यवृत्ती महाविद्यालयाने लाटली हे लक्षात येताच विद्यार्थिनीने अभाविपकडे धाव घेतली.
या संदर्भात विचार ना करण्यासाठी गेलेल्या विद्यार्थिनी आणि अभाविप च्या कार्यकर्त्यांना सुरुवातीला प्राचार्यांनी उडवा उडवीची उत्तरे दिली. अखेर विषय चिघळल्याचे पाहून काल महाविद्यालय व्यवस्थापनाकडून वळते करून विषय संपविण्याचे सांगितले गेले. विद्यार्थी आणि शासनाची फसवणूक करणाºया महाविद्यालयावर कारवाई करण्यात यावी. महाविद्यालय विद्यापीठाच्या कोणत्याही नियमाप्रमाणे चालविले जात नसल्याने त्याची तपासणी करून मान्यता रद्द करण्यात यावी, अशी मागणी अभाविप चे संघटन मंत्री राहुल खरात यांनी केली आहे. याची माहिती मोहाडी पोलीस, विद्यापीठाचे सिनेट सदस्य यांना देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.