
भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : नागझिरा व्याघ्र प्रकल्प परिस- रात दोन जणांचा बळी घेणाºया वाघिणीला जेरबंद करण्यासाठी वनविभागाने आखलेली ‘भक्ष्यांची रणनीती’ अपयशी ठरताना दिसत आहे. आठ भक्ष्यांचा सापळा रचूनही वाघीण सापडत नसल्याने वनकर्मचाºयांची धावपळ वाढली आहे. त्यातच वाघिणीच्या शोध मोहिमेत आता ‘बिबट्याच्या एंट्री’ ने नवीनच अडथळा निर्माण झाला आहे. दरम्यान, सापळ्यातील दोन भक्ष्यांवर बिबट्यानेच ताव मारल्याने संपूर्ण मोहिमेत अनपेक्षित वळण आले आहे. त्यामुळे आता वाघीण ‘हाताबाहेर’ आणि बिबट्याची मेजवानी सुरू झाली असून ‘आॅपरेशन वाघीण’ फ्लॉप ठरणार का असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.
नवेगाव नागझिºयातली ही चतुर वाघीण वनविभागाला चकवा देत असल्याने ‘आॅपरेशन वाघीण’ अडखळले आहे. एकीकडे वाघीण हुलकावणे देत असताना त्याच परिसरात बिबट्याच्या एंट्रीने वनविभागाची डोकेदुखी मात्र वाढवली आहे. वाघिणीला जेरबंद करण्यासाठी तब्बल आठ ठिकाणी रेडकू, बकरे आदी भक्षांची ‘मेजवानी’ ठेवण्यात आली. मात्र, अपेक्षेप्रमाणे वाघीण या सापळ्याकडे आकर्षित होत नसल्याने मोहिमेची गुंतागुंत वाढली आहे. वाघीण वनविभागाच्या १७० हून अधिक कर्मचाºयांना गेल्या पंधरा दिवसांपासून अक्षरश: सळो की पळो करून सोडतआहे. उमरझरीच्या सरपंच सुनीता राजेश हटवार व ग्रामसेवक करण चव्हाण यांनी पुढाकार घेत आवश्यक कागदोपत्री प्रक्रिया पूर्ण केली. मात्र, तोपर्यंत वाघिणीने दुसरा बळी घेतल्याने परिस्थिती अधिक गंभीर झाली. २८ मार्चच्या घटनेनंतर एफडीसीएम, प्रादेशिक विभाग आणि नागझिरा व्याघ्र प्रकल्पाचे कर्मचारी तत्काळ अलर्ट झाले. वाघिणीच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी ९० कॅमेरे बसविण्यात आले असून, विविध ठिकाणी भक्ष्य ठेवून तिला जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न सुरू आहे.