समाजातील शेवटच्या घटकातील मुला-मुलींनीही शिक्षण प्रवाहात येणे गरजेचे – जि.प.मुकाअ एम. मुरुगानंथम

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी गोंदिया : समाजातील शेवटच्या घटकातील मुला-मुलींनीही शिक्षण प्रवाहात येणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी एम. मुरुगानंथम यांनी अण्णाभाऊ साठेनगर, कुडवा येथे आयोजित कार्यक्रमात केले. मांग-गारोडी समाजातील जवळपास ४० कुटुंब मागील कित्येक वर्षांपासून कुडवा या परिसरात राहत असून हा समाज मुख्य प्रवाहापासून आणि शिक्षणापासून वंचित राहिलेला आहे, यांनी मुख्य प्रवाहात यावे असे आवाहन एम. मुरुगानंथम यांनी केले. सहायक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयाद्वारे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर ‘सामाजिक समता सप्ताह’ दि.८ ते १४ एप्रिल २०२६ या कालावधीत आयोजित करण्यात आले आहे. त्यानिमित्ताने अण्णाभाऊ साठेनगर येथील मांग-गारोडी वस्तीमध्ये सोमवारी २५ घरकुलांचा सामुहिक गृहप्रवेश सोहळा आयोजित करण्यात आला होता, त्यावेळी ते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरुन बोलत होते.

यावेळी समाज कल्याण सहायक आयुक्त किशोर भोयर, ग्रामपंचायत कुडवा सरपंच बाळकृष्ण पटले, सामाजिक कार्यकर्त्या डॉ.सविता बेदरकर, माजी सरपंच श्यामदेवी ठाकरे, माजी ग्रामविकास अधिकारी कृष्णकुमार नागपूरे व वस्तीतील प्रतिष्ठित नागरिक विजय पात्रे मंचावर उपस्थित होते. एम. मुरुगानंथम म्हणाले, भारतीय नागरिक म्हणून सर्वांसाठी ‘संविधान’ सारखेच आहे. मांग-गारोडी समाजाच्या उत्थानासाठी समाज कल्याण विभाग कसोशीने प्रयत्न करीत आहे. या समाजातील नागरिक आतापर्यंत पाल टाकून राहत होते. सदर समाजाच्या वस्तीत मुलभूत सुविधा तसेच शासनाच्या योजनांचा लाभ घेण्याकरीता आवश्यक कागदपत्रे/ओळखपत्रे नव्हती. परंतु समाज कल्याण विभागाने या समाजाच्या उत्थानासाठी अथक प्रयत्न करुन रमाई आवास (ग्रामीण) योजनेअंतर्गत घरकुल मंजूर करुन २५ घरकुलांचे बांधकाम करुन दिलेले आहे. त्यामुळे आता आपले स्वत:चे हक्काचे घर निर्माण झाले असल्यामुळे याचा आनंद या समाजातील लोकांच्या चेहºयावर दिसून येत आहे असे त्यांनी सांगितले. एम. मुरुगानंथम पुढे म्हणाले,

या समाजातील मुले शिक्षणासाठी शाळेत/अंगणवाडीत गेली पाहिजेत. आपला उदरनिर्वाह करण्यासाठी आपण छोटे-छोटे व्यवसाय केले पाहिजे. या वस्तीतील सर्व महिलांना बचतगटात समावेश करुन घेण्यात येईल. या वस्तीत जनसुविधा योजनेअंतर्गत रस्ता तयार करण्यात आलेला आहे. आपला समाज पुढे गेला पाहिजे यासाठी आपण स्वत: पुढाकार घेऊन कार्य केले पा-ि हजे. आपल्याकडे कोणतेही कागदपत्रे नसतांना सुध्दा आपल्या समाजासाठी घरकुल मंजूर करण्यात आले, ही या वस्तीसाठी आनंदाची बाब आहे. या वस्तीतील नागरिकांचे जन्म प्रमाणपत्र, राशन कार्ड, जात प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र तसेच पिण्याच्या पाण्याची व्यवस्था व वीजेची सोय उपलब्ध करुन देण्यासाठी जिल्हा प्रशासन स्तरावर मी नक्कीच प्रयत्न करेन अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. प्रास्ताविक समाज कल्याण सहायक आयुक्त किशोर भोयर यांनी केले.

शासनाने सामाजिक न्याय विभागांतर्गत रमाई आवास (ग्रामीण) योजनेअंतर्गत घरकुल योजना सुरु केलेली आहे. त्याअंतर्गत अण्णाभाऊ साठेनगर (कुडवा) येथील मांग-गारोडी समाजाच्या २५ कुटुबांना घरकुलांचा लाभ देण्यात येत आहे. आतापर्यंत या समाजातील ३२ कुटुंबांना राशन कार्ड, ७९ जातीचे व अधिवास प्रमाणपत्र, ६८ आधार कार्ड देण्यात आले व रमाई आवास (ग्रामीण) योजनेअंतर्गत २५ घरकुल मंजूर करण्यात आलेली आहेत. तसेच या वस्तीसाठी शासनाच्या वतीने सर्व मुलभूत सोयी-सुविधा निर्माण करुन देण्यासाठी आपण प्रयत्नशीलअसल्याचे त्यांनी सांगितले.

याप्रसंगी मांग-गारोडी समाजाच्या विकासाकरीता उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल माजी सरपंच कुडवा श्यामदेवी ठाकरे, माजी ग्रामविकास अधिकारी कृष्णकुमार नागपुरे, समाज कल्याण विभागाचे लक्ष्मण खेडकर यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह, शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच २५ घरकुलांचा मुख्य कार्यकारी अधिकारी एम. मुरुगानंथम यांच्या शुभहस्ते रिबीन कापून व भारतीय संविधानाची प्रास्ताविका लाभार्थी कुटुंबांना भेट देऊन गृहप्रवेश करण्यात आले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन समाज कल्याण निरीक्षक स्वाती कापसे यांनी केले. उपस्थितांचे आभार हेमंत घाटघुमर यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी समाज कल्याण निरीक्षक राजेश मुधोळकर यांचेसह गिरीधर गोबाडे, प्रमोद गणवीर, अमर बुल, निवेदिता बघेले, आशिष जांभुळकर, माणिकराव इरले, योगेश हजारे, पुष्पलता धांडे, रोहिणी रामटेके, पंकज काळे, चंद्रकिशोर मेश्राम, प्रकाश मेश्राम व क्रिस्टल कंपनीचे कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *