
भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : मरणानंतर तरी माणसाला दोन वीत हक्काची जागा मिळावी, या माफक अपेक्षेसाठी संगम पुनर्वसित गावातील नागरिकांना तब्बल १८ वर्षे वाट पाहावी लागली. अखेर गावकºयांच्या धाडसी निर्णयाने ही प्रतीक्षा संपली असून, मृतदेहांनीही जणू अखेरचा सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. तालुक्यातील संगम पुनर्वसित येथे अंत्यसंस्कार करण्यासाठी गेल्या १८ वर्षांपासून अधिकृत जागाच उपलब्ध नव्हती. त्यामुळे गावात कोणाचेही निधन झाले की अंत्यसंस्कार कुठे करायचा, हा यक्षप्रश्न ग्रामस्थांसमोर उभा राहायचा. नातेवाईकांची धावपळ, मृतदेहाची हेळसांड आणि मानहानी नित्याचीच झाली होती. विरोधामुळे बांधकाम रखडले गावकºयांच्या मागणीनंतर प्रश- ासनाने पिंडकेपर पुनर्वसन लगत स्मशानभूमीचे बांधकाम सुरू केले. मात्र, प्रस्तावित जागेवर काही लोकांचे खाजगी भूखंड असल्याचे सांगून काही नागरिकांनी विरोध दर्शवला. त्यामुळे बांधकाम अर्धवट अवस्थेत रखडले आणिस्मशानभूमीचा प्रश्न पुन्हा प्रलंबित राहिला.
गावकºयांचा धाडसी निर्णय
शनिवारी रात्री संगम येथील रंजना भीमराव मेश्राम यांचे अल्पशा आजाराने दु:खद निधन झाले. अंत्यसंस्कार कुठे करायचा, हा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला. यावेळी मात्र मेश्राम कुटुंबीय आणि गावकºयांनी धाडसी पाऊल उचलले. सर्व विरोध झुगारून स्मशानभूमीचे बांधकाम सुरू असलेल्या पिंडकेपार लगतच्या जागेवरच अंत्यसंस्कार करण्याचा एकमुखी निर्णय घेतला. रविवारी सकाळी संगमच्या अधिकृत पण उघड्यावरील स्मशानभूमीत गावातील पहिले अंत्यसंस्कार पार पडले. रंजना मेश्राम यांना अग्नी देण्यात आला. १८ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर गावाला हक्काची जागा मिळाल्याने सर्व ग्रामस्थांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.
शेड बांधण्याची ग्रामस्थांची मागणी
मृतदेहाची होणारी हेळसांड आता तरी थांबेल. पण अजूनही उघड्याावरच अंत्यसंस्कार करावे लागत आहेत. पाऊस, ऊन, वारा यापासून संरक्षण नाही. प्रशासनाने आता तातडीने स्मशान शेडचे बांधकाम पूर्ण करावे, अशी आग्रही मागणी ग्रामस्थांनी केली आहे. रंजना मेश्राम यांच्या मृत्यूने आम्हाला हक्काची जागा मिळवून दिली. त्यांच्या कुटुंबाच्या धैर्याचे आम्ही ऋणी आहोत. आता शासनाने तातडीने निधी देऊन स्मशानभूमीचे काम पूर्ण करावे, म्हणजे पुढच्या पिढीला हा वनवास भोगावा लागणार नाही, अशी भावना नागरिकांनी व्यक्त केली.