
भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : शहरात प्रवेश करणाºया कारधा येथील वैनगंगा पुलावर संपूर्ण अंधाराचे साम्राज्य पसरले असून नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे. रात्रीच्या वेळी भंडारा शहरात प्रवेश करताना पुलावर कोणतीही प्रकाश व्यवस्था नसल्याने वाहनचालक, सायकलस्वार आणि पादचारी जीव धोक्यात घालून प्रवास करत आहेत. भंडारा शहर परिसरातील अनेक नागरिक रोज उदरनिर्वाहासाठी शहरात कामानिमित्त ये-जा करतात. मात्र रात्री घरी परतताना पुलावर पूर्ण काळोख असल्याने अपघाताची भीती कायम निर्माण होत आहे.
विशेषत: सायकलस्वार आणि दुचाकी चालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या समस्येबाबत भंडारा येथील काही समाजसेवक तसेच पत्रकारांनी अनेक वेळा प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे. संबंधित विभागाकडे वारंवार पाठपुरावा करूनही या गंभीर समस्येचे निराकरण अद्याप झालेले नाही. अनेक वर्षांपासून नागरिकांकडून मागणी होत असतानाही प्रशासन मात्र दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. हायवे विभागाशी विचारणा केली असता ‘करार संपला’ असे कारण सांगितले जात असल्याची माहिती नागरिकांनी दिली. तर दुसरीकडे संबंधित प्रशासनही जबाबदारी स्वीकारण्यास टाळाटाळ करत असल्याचे दिसून येत आहे. विकासाच्या मोठमोठ्या घोषणा केल्या जात असताना केवळ १० ते २० स्ट्रीट लाईट लावण्याचे काम प्रशासनाकडून होत नसल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. संबंधित विभागाने तातडीने वैनगंगा पुलावर प्रकाश व्यवस्था करावी, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.