
भंडारा पत्रिका/प्रतिनिधी मुंबई : गतकाळातील कार्याचा आढावा घेत नवे संकल्प करण्याचा आजचा दिवस असून राज्याच्या भविष्यातील विजेची गरज पूर्ण करण्याकरिता कार्यक्षमता वृद्धी आणि तंत्रकुशल होणे गरजेचे आहे. माननीय मुख्यमंत्री यांचे नेतृत्वामध्ये राज्य वेगाने प्रगती करत असून भविष्यातील वाढत्या विजेची गरज पूर्ण करण्यासाठी महानिर्मितीच्या प्रत्येक कर्मचारी, अधिकारी यांनी कटिबद्ध होण्याची गरज असल्याचे प्रतिपादन राधाकृष्णन बी. (भा.प्र.से.), अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक महानिर्मिती यांनी केले. ते महानिर्मितीच्या २१ व्या वर्धापन दिनानिमित्त प्रकाशगड येथे आयोजित कार्यक्रमात बोलत होते.
महानिर्मितीचा २१ वा वर्धापन दिन मुख्यालय येथे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक यांचे प्रमुख उपस्थितीत उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान राधाकृष्णन बी. (भा.प्र.से.), अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, महानिर्मिती यांनी भूषविले तर मंचावर मराविमं सुत्रधारी कंपनीचे स्वतंत्र संचालक विश्वास पाठक, संचालक (संचलन) अभय हरणे, संचालक (वित्त) मनेष वाघीरकर प्रामुख्याने उपस्थित होते. मराविमं सुत्रधारी कंपनीचे स्वतंत्र संचालक विश्वास पाठक म्हणाले की, ‘राज्य शासनाचा उपक्रम असलेल्या महानिर्मितीने स्पर्धात्मक दरामध्ये वीज निर्मिती यालाच सर्वोच्च प्राधान्य देणे गरजेचे आहे. महाराष्ट्र शासनाने ऊर्जा क्षेत्रासाठी अत्यंत महत्वाचा निर्णय घेतला असून आगामी काळामध्ये महानिर्मिती कंपनीला भांडवली बाजारात सूचीबद्ध करण्यासाठी आयपीओ आणण्यात येणार आहे.’