भंडारा पत्रिका / प्रतिनिधी आर्वी : जिल्ह्यात सकाळपासून जोरदार पाऊस सुरू आहे. यामुळे नदी, नाल्यांना पूर आला आहे. तालुक्यातील वर्धमनेरी गावाजवळ असलेल्या नाल्याला आज रविवार ०४ रोजी पूर आल्याने आणि पुलावरुन पाणी वाहत असल्याने आर्वी ते वर्धमनेरी हा रस्ता बंद झाला आहे. पुराचे पाणी पुलावरून वाहत असताना देखील धोकादायक प्रवास केला जात आहे. विशेष म्हणजे, प्रवाशांनी भरलेली राज्य परिवहन महामंडळाची बस चालक पुराच्या पाण्यातून काढत असल्याची माहिती आहे. यासोबतच अन्य प्रवासीही आपली वाहने या वाहत्या पाण्यातून काढत असल्याचे सांगण्यात येत आहे. वर्धमनेरी गावाजवळ असलेल्या नाल्याला पूर आला असून पुलावरून पाणी वाहत असल्याने या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली. त्यामुळे अनेक वाहने वाहतूक सुरळीत होण्याची वाट पाहत आहे. असे असताना देखील काही बस चालकांसह इतर चारचाकी वाहनचालक पुलावरून पाणी वाहत असताना सुद्धा जीवघेणा प्रवास करत आहे. त्यामुळे प्रवाशांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे.