भंडारा पत्रिका / प्रतिनिधी नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्थिकलशावर कमळ पुष्पांचा वर्षाव होत असावा, अशी संकल्पना आणि रचना दीक्षाभूमी येथील स्तुपाची आहे. १४० फूट उंच आणि ११८ फूट व्यास असलेला स्तूप आकाशातून पाहिल्यास अशोकचक्रा प्रमाणेच दिसतो. प्रगतीचे प्रतीक आणि धम्माने प्रेरित असलेल्या सदाचरणाचे चकह्य म्हणजे अशोकचक्र ‘अशोकचक्र’ च्या धर्तीवरच दीक्षाभूमी येथील स्तुपाचे बांधकाम करण्यात आले. धम्मचक्र प्रतर्वन दिनाच्या पृष्ठभूमीवर प्रशासन आणि स्मारक समिती सज्ज झाली आहे. त्याअनुषंगाने स्तूप पुन्हा चर्चेत आला आहे. बाबासाहेबांच्या रक्तविहिन क्रांतीचे मूक साक्षीदार म्हणूनही या स्तुपाकडे पाहिले जाते. १९७३ ला स्तुपाचे बांधकाम सुरू होऊन २५ वर्षांनी म्हणजे १९९९ ला बांधकाम पूर्ण झाले. तेव्हापासून डागडुजी झाली नव्हती.
२०१६ मध्ये पहिल्यांदानिविदा काढण्यात आली. मात्र, दोन वर्षांत एकही कंत्राटदार पुढे आला नाही. त्यामुळे २०१९ मध्ये पुन्हा निविदा काढण्यात आली. एककंत्राटदार पुढे आला. मात्र, स्तुपाची उंची आणि व्यास तसेच स्तुपाच्या मूळ संकल्पनेला धक्का न लावता डागडुजी करणे म्हणजे समुद्रातून सुई शोधून आणण्यासारखे आहे. त्यामुळे अजूनही ते काम पूर्ण झाले नाही. अशोकचक्रात चोवीस आरे असतात त्याचप्रमाणे दीक्षाभूमीचा स्तूपाला २४ आरे असून २४ पिल्लरवर उभा आहे. २४ खिडक्या आहेत. २४ कमळपुष्प असून प्रत्येक पुष्प १२ बाय १२ चे आहे. स्तुपाच्या आत असलेल्या बाबासाहेबांच्या अस्थिकलशावर कमळपुष्पांचा वर्षाव होत असावा अशी ती संकल्पना आहे. उपासक, उपासिका, समाजबांधव, पर्यटक, संशोधक, इतिहासकार आणि रस्त्याने ये-जा करणाºयांच्या मनात स्तुपाकडे पाहून अनेक प्रश्न उपस्थित होत असावेत. स्तुपाच्या सभोवताल लोखंडी सेंट्रिंग आहे. स्तुपाला धरून नेमकं काय सुरू आहे? एवढी वर्षे कामाला लागतात काय? कधी होईल काम पूर्ण? अशी कुजबुज आहे.