आजपासून श्री भवानी माता शक्ती मंदिरात नवरात्र उत्सव

यशवंत थोटे मोहाडी : विदर्भाच्या पूर्व टोकावर असलेल्या भंडारा जिल्ह्यातील उत्तर दिशेला मोहाडी हे तालुक्याच ठिकाण आहे. मोहाडीच्या पश्चिम दिशेला श्रीक्षेत्र गायमुख नदीच्या तीरावर सुप्रसिद्ध जागृत माँ चोंडेस्वरी देवीचे निसर्गरम्य मंदिर आहे. मोहाडी या मंदिरातील माँ चोंडेस्वरीदेवीचे दर्शन घेऊन २४ किमी अंतरावर देवमुंढरी येथे दुचाकीने पोहचण्यासाठी ४१ मिनिटे लागतात. हे जागृत वैष्णदेवीचे मंदिर आहे. मोहाडी तालुक्याच्या पश्चिम दिशेला मौदा तालुका लागून असून नागपूर जिल्हा आहे. नागपूर जिल्ह्यातील मौदा तालुक्यातील अरोली पोलीस स्टेशनअंतर्गत १ हजार २०० लोकवस्तीचे देवमुंढरी गाव आहे़. खात रेल्वेस्टेशनपासून दोन किमी अंतरावर आहे. देवमुंढरी येथे श्री भवानी माता शक्तीमंदिर आहे़. श्री भवानी मातेच्या मंदिरात तीन देवीच्या मुर्ती आहेत. माँ काली, महालक्ष्मी आणि मॉ महासरस्वती़, माँ काली ही शक्ती आणि शौर्याचे गुण देणारी तर महालक्ष्मी ही सुख समृद्धी देणारी आणि महासरस्वती ही बुद्धी व कलागुणदेणारी देवी आहे़ वरील सर्व गुणांच्या प्राप्तीसाठी भवानी मातेची मनापासून पुजा केल्यास वरील सर्व गुणांची सहज प्राप्ती होते. या भवानी मातेची किर्ती दूर दूर पसरली असल्यामुळे आता पवित्र तिर्थक्षेत्र म्हणून शासन दरबारी मान्यता मिळाली आहे.

देवमुंढरी हे गाव नागपूर जिल्ह्याच्या मौदा तालुक्यात येत असून खात रेल्वे स्टेशनच्या उत्तरेला दोन किमी अंतरावर आहे.श्री भवानी मातेच्या जिवनात ज्या काही घडामोडी घडल्या त्याचा संक्षिप्त इतिहास पुढीलप्रमाणे वर्णन करण्यात येत आहे. प्राप्त झालेल्या माहितीच्या आधारे असे कळले की मोहाडी तालुक्यातील सितेपार हे गाव घनदाट जंगलात होते. या गावात बसुरामला काशिबाई नावाची एकुलती एक मुलगी होती. तिचा जन्म १७९३ ला याच गावी झाला. हसीराम व त्याचा मित्र होकटूजी मोलमजुरी करण्याकरिता सितेपारला आले. हसिराम याला मुलगी झाली तिचे नाव गंगाबाई होते. होकटू याला एक मुलगा व मुली असे दोन अपत्त्य झाले. मुलाचे नाव सागर व मुलीचे नाव जमुनाबाई होते. गंगाबाई व जमुनाबाईचा जन्म १७९५ ला झाला तर सागरचा जन्म १७९७ ला झाला. काशी, गंगा, जमुना आणि सागर हे चौघे जण नेहमीच एकोप्याने राहून खेळत असत़ याच सितेपार गावात १८०४ मध्ये एक घटना घडली़. या तिन्ही मैत्रीणी खेळता खेळता जंगलात दूरवर निघून गेल्या. त्यांच्या मागे जमुनाचा लहान भाऊ सागरसुद्धा होता. वाघाने सागरवर झडप घेऊन त्याला ठार केले व त्याचे रक्तपिऊन वाघ निघून गेला. आपण खेळता खेळता घनदाट जंगलात आलो हे तिन्हीच्या लक्षात आल्यावर ते परत गावाकडे येत असताना त्यांना सागरचा मृतदेह दिसला़ सागरची अशी अवस्था पाहून तिघीही रडू लागल्या व रडत रडत गावाकडे निघाल्या़ थोड्या अंतरावर यांना वाघ दिसला. त्या पुन्हा जंगलात गेल्या़ जंगलात एक विहिर होती. विहिरीचे पाणी पिऊन त्या झोपल्या.

पळून पळून थकल्यामुळे त्यांना गाढ झोप लागली. रात्री तोच वाघ पुन्हा विहिरीजवळ आला. तिघींना मृत समजून विहिरीत फेकले. तिन्ही मुली व सागर रात्री घरी आले नाही तेव्हा आई-वडिलांनी गावात विचारपुस केली व अन्य लोकांनी जंगलात शोध घेतला पण त्यांचा शोध लागला नाही. काही दिवसांनी एक व्यक्ती लाकडे तोडण्याकरिता जंगलात गेला तेव्हा त्याला सागरचा हाडांचा सांगडा दिसला. काही अंतरावर त्याला विहिर दिसली. त्याला विहिरीत तिन फुलं दिसली. हा चमत्कार गावातील लोकांना सांगितला. तेव्हा बसुराम, हासीराम व होकटू जंगलाच्या विहिरीजवळ जाताच कडू निंबाच्या झाडाखाली वाघ बसलेला दिसला. हे तिघेही झाडाच्या आडोश्याला उभे राहिले. काहीवेळानंतर वाघ निघून गेला. तेव्हा तिघेही विहिरीजवळ गेले. त्यांना सुद्धाविहिरीच्या पाण्यात तिच फुले दिसली. आपल्या मुली व मुलगा गेल्यामुळे ते शोक करू लागले व आपल्या वेदना लोकांना सांगू लागले. काही दिवसांनी तिन्ही मुली आपापल्या आईवडिलांच्या स्वप्नात गेल्या व संपूर्ण वृत्तांत सांगितला. आई-वडिलांची समजूत घालून आम्ही तिघेही जिवंत असून आमचे वास्तव्य तलावाच्या पाळीवर असलेल्या बांबूच्या वनात आहे. आम्ही मजेत असून आमची काळजी करू नये असेही त्या म्हणाल्या…सरते शेवटी बसुराम, हरिराम, होकटू व गावकरी मंडळ तिघींच्या शोधात जंगलातील तलावाच्या काठी आले. आम्ही इथेच आहोत, असा ध्वनी लोकांनी ऐकला, गावकरी बांबूच्या झुडपाजवळ गेले व त्याला तोडू लागले.

बांबू तोडत असताना एका ठिकाणी एका रांगेत तीन जागी रक्ताची धार वाहतांना दिसली. थोड्यावेळानंतर तेथे तीन कोंब फुटली. तुम्ही आमची सेवा करा, आम्ही तुमचे कल्याण करू, असा लोकांनी आवाज ऐकला तेव्हापासून या जागेला विशेष महत्त्व प्राप्त झाले. या जागेला देवमुंढरी या नावाने ओळखले जाते. भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर या जंगलात किन्ही हे गाव आहे़. यागावावरून श्री वडगुजी व त्यांच्या पत्नी चिमनाबाई शेती, मोलमजुरीकरीता देवमुंढरी येथील पाचघरे कुटुंबाकडे आले. देवमुंढरी भागात पोट भरणे शक्य नसल्यामुळे तेवढ्यात जाण्याकरिता निघाले. मॉ भवानीने चिमनाबाईला साक्षात्कार दिला. तेव्हापासून चिमनाबाई नित्यनेमाने देवीची पुजा करू लागली. इतर भाविकांच्या सहकार्याने रेतीमातीचे देऊळ बांधण्यात आले़. भवानी मातेच्या मुर्तीची प्राणप्रतिष्ठा सन १८१० च्या सुमारास झाली असावी. सुरूवातीला चिमनाबाईने ३० वर्ष भवानीमातेची सेवा केली. चिमनाबाईचा मुलगा राघोयाने ३५ वर्ष भवानी मातेची सेवा केली. राघोचा मुलगा तुकाराम यानी ५१ वर्ष मातेची सेवा केली. कुही तालुक्याच्या माळणी गावातून आलेले श्री कान्हूजी यांनी २१ वर्षे सेवा केली व देवळातच त्यांना मृत्यू आला. कान्हूजी यांनी मरणापूर्वी विठोबाजी यांना मातेची सेवा करावयास सांगितले, विठोबाजींनी २९ वर्ष मातेची सेवा केली. विठोबाजीच्या मृत्यूपर्यंत त्यांच्या पत्नी सखूबाईने १० वर्ष सेवा केली व त्या मरण पावल्या. सखूबाईचा मुलगा कवडू यांनी काही दिवस मातेची सेवा करून ते नागपूरला निघून गेले.

श्री नथ्थूजी भर्रे यानी नवरात्रात घटमांडण्याकरिता सुरूवात केली. १९७० पासून नागपूरची बरीच मंडळी दर्शनाकरिता देवमुंढरीला येवू लागली. मातेचे मंदिर तयार करण्याकरिता नागपूरला वेगवेगळ्या ठिकाणी सभा होऊ लागल्यात. मातेच्या मंदिराचे जिर्णोद्धार व नियमित पुजापाठ करण्याच्या हेतूने एक पंचकमेटी तयार करण्यात आली व तिला नागपूर सहधर्मदाय आयुक्ताकडून पंजीकृत करण्यात आले. १९८२ मध्ये मंदिराचे बांधकाम करण्यात आले. १२००० चौ.फुटाची जागा शासनाकडून मिळविण्यात आली. देवमुंढरी येथे सन १९९८ पासून आपल्या मनोकामना पूर्ण करण्याकरिता घटस्तंभाची स्थापना करण्यात येते. सन १९९८ ला २१, सन १९९९ ला ७५, सन २००० ला १११, सन २००१ला २५१, सन २००२ ला ३५१, सन २००३ ला ४५१, सन २००४ ला ५५१, सन २००५ ला ६५१, सन २००६ ला ७१५, सन २००७ ला ७३०, २००८ ला ५०३, सन २००९ ला ७४५, सन २०१० ला ७७५, सन २०११ ला ७८५, सन २०१२ ला ७९५, सन २०१३ ला ८३५, सन २०१४ ला ८५०, सन २०१५ ला ८७५, सन २०१६ ला ८७८, सन २०१७ ला ८८७, सन २०१८ ला ९१४, सन २०१९ ला ९६५, २०२० ला १०२१ ला ६४९ २०२२ ला घटांची स्थापना करण्यात आली होती. ७०१ रुपये प्रमाणे असे एकूण ४ लाख ५४ हजार ९४९ रुपयांची नोंद करण्यात आली आहे.

मोहाडी येथील बसस्थानक टी-पॉईटवरील बारई राईस मिलच्या प्रांगणात असलेल्या विदर्भ कोकण ग्रामीण बँकेचे माजी व्यवस्थापक मेघराज जागोबाजी झंझाड भंडारा हे श्री भवानी माता शक्ती मंदिर पंचकमेटीचे अध्यक्षपदावर कार्यरत आहेत. पंचकमेटीच्या मार्गदर्शनाखाली अश्विन नवरात्र ते विजयादशमीनिमित्त अन्नदान करण्याचा संकल्प २०१२ पासून सुरूवात करण्यात आला आहे़. या योजनेला श्री भवानी माता शक्ती मंदिर पंचकमेटीच्या वतीने अक्षय अन्नदान योजना भाविकांच्या सहकार्याने राबविण्यात येत आहे. अन्नदान दुपारी १२ ते ३ व रात्री ८ ते १० वाजतापर्यंत स्रेहभोजन देण्यात येत असल्याने भाविकांची मोठ्या प्रमाणात दर्शनानिमित्त गर्दी राहत होती. सोमवार दि.२६ सप्टेंबर ते ५ बुधवार दि.५ सप्टेंबर २०२२ पर्यंत श्री भवानी माता शक्तीमंदिर तिर्थक्षेत्र देवमुंढरी येथे नवरात्र महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे़. सोमवार दि.२६ सप्टेंबर २०२२ ला दुपारी १२ वाजता घटस्थापना, ज्योतप्रज्वलन करण्यात आले. भवानीमाता शक्तीमंदिर पंचकमेटीचे अध्यक्ष मेघराज झंझाड, आसाराम पाचबुद्धे, दिगंबर धांडे, मंगेश धांडे, बाळकृष्ण पालांदूर, नरेंद्र भुते, अशोक धांडे, डॉ.अशोक झंझाड, राजेंद्र भुते, चंदू धांडे, विनोद कहालकर, अंकूश झंझाड, सुशिल खोब्रागडे, केशवराव भुते, विनोद भुते, मंगेश तलमले, मोरेश्वर झंझाड, नागेश वाघाये, अमोल ठाकरे, निलकंठ भर्रे, नंदलाल पाटील, देवेंद्र खराबे यांच्या नेतृत्वाखाली शारदीय नवरात्र उत्सव पार पडणार आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *