भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गोबरवाही : कोरोनामुळे अडीच वषार्पुर्वी बंद करण्यात आलेली तिरोडीइतवारी पॅसेंजर रेल्वेगाडी सोमवार १७ आॅक्टोबर पासून पुन्हा सुरू होणार आहे. यामुळे तब्बल अडीच वर्षापासून प्रवासाकरिता अडचणीचा सामना करणा-या तुमसर, मोहाडी तालुक्यातील ग्रामीण प्रवाशांमध्ये आनंद व्यक्त केला जात आहे. तिरोडी ते इतवारी पॅसेंजर रेल्वे ही नागपूर, भंडारा जिल्ह्यातील ग्रामीण भागातून मध्यप्रदेश पर्यंत प्रवास करणाया हजारो प्रवाशांकरिता अत्यंत सोयीची आहे. दोन राज्यांना जोडणारी तिरोडीइतवारी पॅसेंजर कोरोना काळात बंद करण्यात आली होती. यामुळे नागपूर येथे जाणा-या तुमसर, मोहाडी तालुक्यातील तसेच लगतच्या माध्यप्रदेशातील सिमावर्ती भागातील ६० ते ७० गावातील प्रवाशांना मोठा आर्थिक त्रास सहन करावा लागत होता. तिरोडी, डोंगरी, चिखला येथे मॅग्नीज खाणी असल्याने येथील कामगारांना मॉयलचे मुख्यालय असलेल्या नागपूर येथे कामानिमित्त येजा करण्यासह समस्या येत होती. त्यामुळे सदर पॅसेंजर रेल्वे सुरू करण्याची मागणी प्रवाशांकडून वारंवार होत होती. प्रवाशांना होणा-या त्रासाची दखल घेत नागपूर विभागीय रेल्वे व्यवस्थापकांनी १७ आॅक्टोबर पासून तिरोडी- इतवारी पॅसेंजर रेल्वे सुरू करण्याचे निर्देश दिले. ही गाडी तिरोडी येथून सकाळी ८ वाजता इतवारी नागपूर करिता सुटणार आहे. दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वेच्या या निर्णयामुळे मॉयल खाण क्षेत्रातील कामगार, युनियनचे सदस्य तसेच मध्यप्रदेशच्या सिमावर्ती भागातील नागरिक व तुमसर टाऊन रेल्वे प्रवाशांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. आता याच रेल्वे मार्गावर थेट बालाघाट, नैनपूर, जबलपूर कडे जाणारी पॅसेंजर तथा एक्सप्रेस रेल्वेगाड्या सुरू होण्याची प्रतिक्षा प्रवासी करीत आहेत.