दोन शिक्षकांवर पाचशे विद्यार्थ्यांचा भार

वार्ताहर सिहोरा : जिल्हा परिषद हायस्कूल सिहोरा येथे केवळ दोनच शिक्षक कार्यरत असून ११ शिक्षकांना मानधन मिळत नसल्यामुळे ते रजेवर आहेत. त्यामुळे येथील पाचशेवर विद्यार्थ्यांचा भार दोन शिक्षकांना पेलवेनासा झाला आहे. शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, असे म्हटले जाते. परंतु ज्या शाळेत शिक्षकच नसतील तेथील विद्यार्थ्यांना विद्या कोण देणारा हा प्रश्न आहे. सिहोरा येथील जिल्हा परिषद शाळेत इयत्ता सहावी ते बारावीपर्यंत ५२६ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. परंतु शिक्षकांअभावी त्या विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात आहे. येथील ११ शिक्षक हे घड्याळी तासिका प्रमाणे ठेवल्या गेले आहेत. त्या शिक्षकांना प्रती तासिका ५५ रुपया पासून ७२ रुपयापर्यंत मानधन जिल्हा परिषदेच्या वतीने दिले जाते. परंतु चार महिन्यापासून मानधन न मिळाल्यामुळे ते रजेवर असून सध्यादोनच शिक्षक कार्यरत आहेत. त्यामुळे ५२६ विद्यार्थ्यांचा भार आता कार्यरत असलेल्या दोनच शिक्षक सांभाळत आहे. त्यातील एकाद्याला काही कामानिमित्त बाहेर जावे लागल्यास केवळ एकच शिक्षक उपस्थित राहत असल्याने पालकांकडून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. याबाबत जि.प. शाळेचे मुख्याध्यापक ओ.बी. गायधने यांना विचारले असता त्यांनी नियमित शिक्षकांसाठी जिल्हा परिषदेकडे पाठपुरावा केला असल्याचे सांगितले.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *