भंडारा पत्रिका/प्रतिनिधी गोंदिया : खरीप हंगामातील धान खरेदी १ आॅक्टोबर रोजी आणि रबी हंगामातील धान खरेदी १ मे रोजी सुरू करण्याचे शासकीय धोरण आहे. त्यामुळे नियोजित तारखांप्रमाणेच आधारभूत केंद्र सुरु होणे आवश्यक असल्याचे वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले. गोंदिया, चंद्रपूर, भंडारा आणि गडचिरोली जिल्ह्यातील आधारभूत धान खरेदी अंतर्गत उद्भवणाºया विविध अडचणीं संदर्भात मंत्रालयात (२२ नोव्हेंबरला) वनमंत्री मुनगंटीवार आणि अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीला खासदार सुनील मेंढे, आमदार विजय रहांगडाले, साहसराम कोरोटे, सुभाष धोटे, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाचे सचिव विजय वाघमारे, चंद्रपूरचे जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्यासह गोंदिया, भंडारा आणि गडचिरोली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते. मुनगंटीवार म्हणाले की, जिल्ह्यातील आधारभूत केंद्रांवर बहुप्रतीक्षित असलेली धानाची खरेदी सुरू झाली असली तरी वेग मंद आहे. मंजुरी मिळालेल्या काही केंद्रावर प्रत्यक्षात खरेदी सुरु आहे. याबाबतची सर्व माहिती पणन विभागाने एकत्र करावी.
धान उत्पादक शेतकºयांना धान आधारभूत केंद्रांवर आपले धान विकण्यासाठी त्रास सहन करावा लागत असल्याने ही प्रक्रिया सरळ, सुलभ आणि सुरळीत करण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्यात याव्यात. तसेच येत्या १५ दिवसांत धान खरेदीसंदर्भात एक स्वतंत्र बैठक उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात येईल. धान खरेदी प्रक्रिया नियोजित वेळापत्रकानुसार होणे आवश्यक आहे. तसेच यावर्षी धान खरेदी संदर्भातील शासन निर्णय उशिरा निर्गमित झाल्याने शेतकºयांची नोंदणी होण्यास विलंब होतो, त्यामुळे यानंतर हे असे होणार नाही, यासाठी एक प्रमाणित कार्यपद्धती तयार करण्यात यावी. गोंदिया, भंडारा आणि गडचिरोलीयांच्यापेक्षा चंद्रपूर येथे धान खरेदी कमी झाली आहे, याचे नेमके कारण तपासून घ्यावे, अशा सूचना मुनगंटीवार यांनी संबंधित जिल्हाधिकारी यांना दिल्या.