भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात किमान तापमानात घट झाली आहे. याचा परिणाम म्हणून सध्या राज्यात थंडी वाढली आहे. सध्या मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्र चांगलाच गारठला आहे. काही ठिकाणी तापमानाचा पारा १०अंशाच्या खाली आला आहे. ख्रिसमस २५ डिसेंबरनंतर मुंबईत हिवाळा वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, बुधवारपासून राज्यात पुन्हा गारठा वाढला आहे. पुढील काही दिवस थंडी हळूहळू वाढत जाणार असल्याचा अंदाज आहे. दरम्यान, डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीला तामिळनाडूच्या किनारपट्टीवर आलेल्या मेंडोस चक्रीवादळाचा परिणाम वातावरणावर झाला होता. या चक्रीवादळामुळे राज्यात थंडी कमी झाली होती. अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण तयार झाले होते तसेच काही ठिकाणी पाऊस देखील पडला होता. आता चक्रीवादळाचा प्रभाव कमी झाला आहे. त्यामुळे पुन्हा राज्यात थंडी जाणवू लागली आहे. ही थंडी ३१ डिसेंबरपर्यंत कायम राहण्याची शक्यता हवामानतज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी व्यक्त केली आहे.ं