भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : जिल्हा काँग्रेस कमिटी परिवहन विभाग चालक मालक संघटना जिल्हाध्यक्ष शिवा गायधने यांच्या नेतृत्वात मोर्चा करण्यात आला. केंद्रातील मोदी सरकारने आणलेला नवीन मोटार वाहन कायदा हा वाहन चालकांसाठी अत्यंत कठोर व जुलमी आहे. या काळ्या कायद्यानुसार अपघात झाल्यास ट्रक चालकास दहा वर्षांची शिक्षा तसेच सात लाख रुपयांचा दंड भरावा लागणार आहे. या काळ्या कायद्याविरोधात वाहन चालकांमध्ये तीव्र संताप असून टँकरचालकांनी संप पुकारला आहे, या संपाला काँग्रेसचा पाठिंबा आहे. वाहन चालकांवर अन्याय करणारा जुलमी, अत्याचारी नवीन मोटार वाहन कायदा रद्द करावा. अशी मागणी भंडारा जिल्हा परिवहन सेल तर्फे करण्यात आली. दुचाकी वाहन, टॅक्टर चालवण्यासही चालकांना भिती वाटावी असा जुलमी, कठोर व अत्याचारी मोटर वाहन कायदा मोदी सरकारने आणला आहे.
या कायद्यामुळे स्वताचे वाहन चालवण्यासही लोकांना भिती वाटत आहे. आधीच्या कायद्यानुसार अपघात झाला तर १-२ वर्षांची शिक्षा व १ हजार रुपयांचा दंड होता पण नवीन कायद्यानुसार १० वर्षांपर्यंत शिक्षा व ७ ते १० लाख रुपयेदंडाची तरतूद आहे तसेच हा कायदा आता अजामिनपात्र आहे. या कठोर काळ्या कायद्याविरोधात जनतेत जीव्र नाराजी आहे. हा काळा कायदा मंजूर करून घेण्यासाठीच मोदी सरकारने विरोधी पक्षांच्या १४६ खासदारांना निलंबित केले. या काळ्या कायद्याला काँग्रेस पक्षाचा विरोध असून चालकांनी पुकारलेल्या संपाला पाठिंबा आहे. यावेळी भंडारा जिल्हा अध्यक्ष मोहनभाऊ पंचभाई, परिवहन सेल चे जिल्हा अध्यक्ष शिवा गायधने, धनंजय तिरपुडे, धर्मेंद्र बोरकर, आवेश पटेल, राजेश कुटे, विजय देशकर, गजानन बादशाह, चंद्रशेखर बनकर, व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.