भंडारा पत्रिका / प्रतिनिधी पुणे : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावी आणि बारावी परीक्षेदरम्यान गैरप्रकार घडणाºया केंद्रांवर शिक्षण विभागातर्फे कठोर पावले उचलली जाणार असल्याचे मंडळातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. दहावी-बारावी परीक्षेत यंदा बैठे पथक संबंधित शाळेत पूर्णवेळ हजर राहणार आहे. बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारी ते २१ मार्च आणि दहावीची परीक्षा २ते २५ मार्च या काळात घेतली जाणार आहे. मागील वर्षी दहावी-बारावीच्या परीक्षेत मोठ्या प्रमाणावर गोंधळ पाहायला मिळाला होता. काही ठिकाणी मुलांना बसण्यासाठी जागा नसल्याने शामियाना टाकून बसवण्यात आले होते. काही ठिकाणी विषय शिक्षकच मुलांना कॉपी पुरवत असल्याचे समोर आले होते. विशेष म्हणजे, औरंगाबादच्या या घटनांची दखल अधिवेशनात घेण्यात आली होती. त्यामुळे यंदा कॉपीसारखे गैरप्रकार टाळण्यासाठी मंडळातर्फे विशेष खबरदारी घेतली जाण्याची शक्यता आहे. परीक्षेच्या काळात गैरप्रकार टाळण्यासाठी बैठे पथक संबंधित शाळेत पेपरच्या संपूर्ण वेळेत बसून राहणार आहे. या पथकात किमान चार सदस्य असतील. त्यातील दोन सदस्य प्रत्येक परीक्षा ब्लॉकमधून फेरी मारतील, दोन सदस्य परीक्षा केंद्राच्या आवारात लक्ष ठेवतील. परीक्षा दालनात गैरप्रकार निदर्शनास आल्यास पथकाने त्याची नोंद घेऊन केंद्र संचालकाच्या निदर्शनास आणावी तसेच आवश्यक त्या सूचना पोलिसांना देण्यात येतील. परीक्षा केंद्राच्या बाहेर कॉपी पुरविणार्ºयांचा घोळका असेल तर, त्यावर नियंत्रण आणण्यासाठी पोलिसांचा बंदोबस्त असणार आहे, अशी माहिती अधिकाºयांनी दिली.