भंडारा पत्रिका / प्रतिनिधी साकोली : नेहमी होत असलेल्या त्रासाला कंटाळून पत्नीने पोलिसात तक्रार दिली होती. पती-पत्नीमध्ये समझौत्यासाठी अभय समुपदेशन केंद्रात सुनावणी दरम्यान पती आणि पत्नीचा वाद विकोपाला गेला. यादरम्यान रागाच्या भरात पतीने पत्नीच्या गळ्यावर ब्लेडने वार केला. यामध्ये पत्नी गंभीररित्या जखमी झाल्याने भंडारा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. या प्रकरणी मारेकरी पतीला पोलिसांनी अटक केली आहे. प्राप्त माहितीनुसार ग्राम खांबा जांभळी निवासी अश्विन कुमार राजकुमार मेश्राम (२९ वर्ष) व टिकेश्वरी अश्विन मेश्राम (२२ वर्ष) या दोघा पतीपत्नीमध्ये क्षुल्लक कारणावरून भांडण होत होती. पत्नी टिकेश्वरीने नेहमीच्या भांडण तंट्यांना कंटाळून पोलिसात तक्रार दाखल केली होती.
सदर प्रकरण पती-पत्नीतील समझौता करण्यासाठी अभय समुपदेशन केंद्र साकोली येथे दोन मार्च रोजी सुनावणी करीता ठेवण्यात आली होती. सुनावणी दरम्यान पती अश्विन पत्नी टिकेश्वरीला घरी नेण्यासाठी तयार होता. मात्र पत्नी टिकेश्वरीने जाण्यास नकार दिल्याने वाद वाढला आणिरागाच्या भरात अश्विन ने टिकेश्वरीच्या गळ्यावर धारदार ब्लेडने वार केला. यामध्ये गंभीररित्या जखमी झालेल्या टिकेश्वरीला भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचाराकरिता दाखल करण्यात आले आहे. तर मारेकरी पती अश्विन मेश्राम याला पोलिसांनी अटक करून कलम ३०७ भादंवी अन्वये गुन्हा दाखल केला आहे