भंडारा पत्रिका/प्रतिनिधी नागपूर : विचार, तत्व, प्रणाली यांना कुस्करून केवळ व्यवहारवादाचे स्तोम वाजविण्याला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी कडाडून विरोध केला होता. आज नेमके तेच भारतात दिसत आहे. आजच्या व्यवहारवादाने इष्ट अनिष्ट कोणतेच वस्त्र अंगावर ठेवलेले नाही. अशापद्धतीने विचारसरणीची लढाई लढायला सारेच दुबळे ठरत असतील तर हा नव्या अंधार युगाचा प्रारंभ म्हणता येईल, असे परखड मत ज्येष्ठ पत्रकार व आंबेडकरी विचारवंत प्रा. रणजित मेश्राम यांनी व्यक्त केले. महावितरणच्या नागपूर परिमंडलातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या१३२ व्या जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून प्रा रणजित मेश्राम बोलत होते.
अध्यक्षस्थानी महावितरणचे प्रादेशिक संचालक सुहास रंगारी होते. रणजित मेश्राम यांनी आर्थिक संरचनेला मुलभूत अधिकारात घ्यावे या बाबासाहेबांच्या वारंवारच्या आग्रहाकडे या देशाने दुर्लक्ष केले. अशा बºयाच अनुल्लेखित व दुर्लक्षित घटनांचा आपल्या भाषणातून आढावा घेतला. यावेळी मंचावर मुख्य अभियंता दिलीप दोडके प्रामुख्याने उपस्थित होते. अध्यक्षस्थानावरुन बोलताना सुहास रंगारी यांनी प्रजा व नागरिक यातील भेद स्पष्ट केला. शिवाय, विविध प्रसंग व उदाहरणे सांगून बाबासाहेबांप्रती आपली कृतज्ञता व्यक्त केली. याप्रसंगी मुख्य अभियंता दिलीप दोडके यांचेही समयोचित भाषण झाले.
यावेळी खगोलशास्त्रावर आधारित व्हॉट इफ स्पेसचा लेखक सिद्धांत सुशांत शृंगारे याचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाला महा व्यवस्थापक (वित्त व लेखा) शरद दाहेदार, अधीक्षक अभियंते अमित परांजपे, अविनाश सहारे, अजय खोब्रागडे, हरिष गजबे, नारायण लोखंडे, कार्यकारी अभियंते हेमराज ढोके, राजेश घाटोळे, समीर टेकाडे, राहुल जीवतोडे, प्रफुल्ल लांडे, बी.ए. हिवरकर, रुपेश टेंभुर्ण व सहमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी मधुसूदन मराठे हे आवर्जून उपस्थित होते. प्रास्ताविक सुशांत श्रृंगारे, संचलन बंडू शंभरकर व आभार प्रदर्शन निशा चौधरी यांनी केले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित होती.