भंडारा : हवामानातील बदलामुळे उष्णतामानात मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. यामुळे उन्हाचा फटका मानव व पशु-पक्षी यांना सहन करावा लागतो आहे. कारण एप्रिल-मे महीन्यात सुर्य आग ओकत असतो आणि ओकत आहे. यापासुन सर्वांनीच सावध रहाण्याची गरज आहे. कारण यामुळे त्वचा कोरडी होणे, डोळ्यांची अंगार होणे, ओठ सुकणे, घाम येणे बंद होणे, चक्कर येणे, मळमळ वाटणे, डोकेदुखी, पोटदुखी, अंगदुखी इत्यादी प्रकारांचा त्रास होतो. त्यामुळे सर्वांनीच उन्हापासून बचावात्मक पवित्रा स्वीकारला पाहिजे. अन्यथा थोडीशी चुक उष्माघाताचे कारण बनू शकते व यामुळे जीवीतहानी सुध्दा होवू शकते याला नाकारता येत नाही.
कारण राज्यात सध्याच्या परिस्थितीत बहुतांश ठिकाणी कमाल तापमान ४० अंशाहून अधिक आहे आणि ही सर्वांसाठी धोक्याची घंटा आहे. हवामान अंदाज सांगतो की पुढील काळात उष्णता आणखी वाढण्याची चिन्हे आहेत. म्हणजे उष्णतेचा धोका अजून पर्यंत टळलेला नसुन आणखी गडद होण्याची शक्यता दिसून येते.त्यामुळे सर्वांनीच सावधगिरी बाळगली पाहिजे. याकरिता भरउन्हातफिरणे टाळावे. बाहेर जायचेच असेल तर नाकातोंडाला दुपट्टा बांधून घराच्या बाहेर पडावे. अन्यथा शरिरावर विपरीत परिणाम होवून उष्माघात होऊ शकतो. दुपारी १२ ते ३ या कालावधीत घराच्या बाहेर पडणे टाळावे. त्याचप्रमाणे वाढते उष्णतामान पहाता पाणी भरपूर प्यायला हवे. सध्याच्या परिस्थितीत उष्णतेची लाट संपूर्ण भारतात सुरू आहे. पूर्व भागात पुढील चार दिवस वायव्य भागात आणखी दोन दिवस उष्णतेची लाट राहण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रासह संपूर्ण भारतात आपल्याला उष्णते लाट प्रखर दिसून येते. उष्माघातामुळे मृत्यू कसा ओढावतो हे आपल्याला मुंबईतील खारघर येथे दिसून आले. नवी मुंबईच्या खारघरमध्ये महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्याच्या कार्यक्रमाच्या दरम्यान लाखोंच्या संख्येने श्री सेवक जमा झाले होते.
या दरम्यान १३ जणांचा उष्माघातानेमृत्यू झाल्याचे सांगितले जाते. ही अत्यंत दु:खद घटना आहे. आपण अत्याधुनिक युगात रहातो आणि सध्या कडक उन्हाळा आहे ही बाब सर्वांनाच ग्यात आहेच व सोबतच हवामानाचा अंदाज सुध्दा लक्षात असतांना असे कार्यक्रम भर उन्हात घ्यायला पाहिजे नव्हते. परंतु खारघरमध्ये घडलेली घटना लक्षात घेता व वाढता उन्हाळा पहाता कमीत कमी दोन महिने कोणतेही कार्यक्रम आयोजकांनी मग ते कोणतेही क्षेत्रातील असो राजकीय, सामाजिक किंवा इतर कोणत्याही सभा किंवा कार्यक्रम टाळले पाहिजेत. खारघरमधील उष्माघाताची घटना घडु नये परंतु घडली यांची जाणीव ठेवून पुढील दोन महिन्यांत आपण आपला व सर्वांचा बचाव उष्माघातापासून कसा करू शकतो याकडे प्रशासन, सरकार, राजकीय पुढारी, सामाजिक संघटना यांनी लक्षात केंद्रीत केले पाहिजे. कारण वाढत्या तापमानाचा व उष्णतेचा फटका मानवाप्रमाणेच पशुपक्ष्यांना सुध्दा सहन करावा लागत आहे. याकरीता सर्वांनीच उष्णतेपासुन आपला बचाव करावाच परंतु सोबतच आपल्याला जमेल त्या पद्धतीने पशुपक्ष्यांसाठी सुध्दा पाण्याची व्यवस्था करावी. यामुळे त्यांचेही प्राण वाचेल व त्यांचा उष्णतेपासून बचाव होईल.