भंडारा पत्रिका/प्रतिनिधी गोंदिया : सृष्टीतील सर्व प्राण्यांमध्ये मानव बुध्दीमान मानला जातो. प्रकृती, संस्कृती आणि विकृती या तीन पध्दतीमध्ये मानव जीवन जगत असतो. प्रकृतीच्या आचरणात संत महात्मे मोडतात. परंतु, सर्वसामान्य नागरिकाने संस्कृतीच्या आचरणातून जीवनाचा आनंद घ्यावा. जीवन सुंदर आहे. सर्वांशी प्रेमाने वागावे, असा संदेश अंतर्मना १०८ आचार्य श्री प्रसन्न सागर जी महाराज यांनी दिला. स्थानिक नमोद महाविद्यालयात ७ मे रोजी गोंदिया शिक्षण संस्थेच्या वतीने आयोजित प्रबोधन वस्वागत समारोहात ते आपल्या अमृत वाणीतून भाविकांना संबोधित करीत होते.
प्रसन्नसागर महाराज पुढे म्हणाले, शांती आणि प्रसन्नता या दोन बाबी ख-या जीवनाची कमाई आहे. जीवन बहुमुल्य आहे. म्हणून जीवन जगताना संस्कृती आचरणात असावी. आजकल विकृतीचे आचरण मोठ्या प्रमाणात पहावयासमिळते. प्रत्येक मानवात सहनशिलता, आदरभाव आणि नमन भाव ठेवावा. तो मानव निश्चितच जीवनात यश प्राप्त करतो. आजकल नविन पिढी मोठ्या प्रमाणात मानसिक आजाराला बळी पडत आहे. याचे मुख्य कारण मोबाईल संच ठरला आहे. विद्यार्थी जीवन ओल्या मातीसारखे आहे. शिक्षक व आईवडिलाकडून जसे आचरण दिले जाईल तसा विद्यार्थी घडणार आहे.
शिक्षकांनी विद्यार्थ्यांसमोर संस्कृतीचे दर्शन घडवावे, तेव्हा सुसंस्कृत समाज घडेल असा मोलाचा सल्ला देखील त्यांनी दिला. याप्रसंगी आचार्य प्रसन्नसागर महा- राज यांच्या सोबत आलेल्या ऋषीमुनींनी देखील मार्गदर्शन केले. तत्पूर्वी गोंदिया शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा वर्षा पटेल, आ. मनोहर चंद्रिकापुरे, आ. विनोद अग्रवाल यांच्यासह जैन समाज संघटनेच्या अध्यक्ष व पदाधिकारी तसेच माजी आमदार राजेंद्र जैन यांनी ऋषीमुनींना श्रीफळ देवून नमन केले. संचालन माजी आमदार जैन यांनी केले. याप्रसंगी हजारों धर्मप्रेमी समाज बंधू, गोंदिया शिक्षण संस्थेचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी कार्यक्रमाला मोठ्या संख्येत उपस्थित होते.