भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : कोतवाल पदभरती २०२३ मध्ये लाखनी तालुक्यातील भरती प्रक्रियेत लेखी आणि मौखिक परीक्षेमध्ये घोळ झाल्यामुळे सदर निवड प्रक्रिया रद्द करावे अशी मागणी बहुजन समाज पार्टी तर्फे करण्यात आली असून या मागणीचे निवेदन आज सोमवारला जिल्हाधिका-यांना देण्यात आले. सन २०२३ कोतवाल पदभरती प्रक्रियेमध्ये लाखनी तालुक्यातील उमेदवारांची लेखी व मौखिक परीक्षा घेऊन पात्र उमेदवारांची निवड प्रक्रिया करण्यात आली असून त्या प्रक्रियेत अभ्यासू, हुशार उमेदवारांना डावलून आर्थिक पाठबळाच्या आधारावर हेतूपरस्पर व राजकीय हितसंबंधापोटी मौखिक परीक्षेतील गुण अधिकाधिक वाढवून देण्यात आल्याचे लक्षात येत असून पात्र उमेदवारांना त्या प्रक्रियेतून जाणीवपूर्वक डावलण्याचा प्रयत्न प्रशासकीय यंत्रणेच्यामाध्यमातून झाल्याचे निदर्शनास येत असल्याचा आरोप परीक्षा पात्र उमेदवारांनी केला असून त्याची सखोल चौकशीची मागणी केली आहे.
पात्र उमेदवार आणि अपात्र उमेदवार यांची पुनश्च: निवड समिती मार्फत पारदर्शकतेच्या आधारावर बुद्धिमत्ता परीक्षा घेऊन निवड करून हेतूपरस्पर डावललेल्या पात्र उमेदवारांना न्याय मिळवून देण्यासाठी बहुजन समाज पार्टीच्या वतीने मागणी करत असून ती निवड प्रक्रिया तात्काळ प्रभावानेथांबवण्याची विनंती निवेदनाद्वारे करण्यात आली असून त्या विषयाचे गांभीर्य लक्षात घेता योग्य प्रशासनिक न्याय उमेदवारांना द्यावा अन्यथा लाखनी तालुक्यातील पिडीत उमेदवारांसोबत आंदोलन करण्यात येईल असा इशारा बहुजन समाज पार्टी तर्फे देण्यात आला आहे.
निवेदन देतेवेळी बहुजन समाज पक्षाचे महाराष्ट्र राज्य सचिव शंकर भेंडारकर, जिल्हा अध्यक्ष पाम्बीर्द, जिल्हा कोषाध्यक्ष रवि गजभिये, जिल्हा सचिव उमराव शेलोकर, जिल्हा सचिव धीरज गोस्वामी, वरिष्ठ बसपा कार्यकर्ता यशवंत वैद्य, संजय नासरे, कृष्णा गजभिये, शशिकांत रामटेके, प्रकाश कडव, फैज अहमद सैय्यद, मोहम्मद शेख, कृष्णा गोमाये, आकाश इलमकार, सचिन शेन्डे आणि अमन वाघमारे तसेच अन्याग्रस्त उमेदवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.