भंडारा पत्रिका/प्रतिनिधी लाखांदूर : आपला मुलगा त्याच्या आयुष्यात यशस्वी होण्यासाठी प्रत्येकच पालक बुटाच्या पॉलीश पासून ते डोक्याच्या मालिश पर्यंतचे काम करतात. विद्यार्थ्यांनी देखील आई-वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासह योग्य प्रशासन चालविण्यासाठी प्रशासकीय सेवेत येण्याचे आवाहन करीत स्पर्धा परीक्षे शिवाय विद्यार्थ्यांना तरुणोपाय नाही, असे मत प्रा विनोद बागडे यांनी व्यक्त केले. ते २१ जून रोजी स्थानिक भागडी येथे आयोजित करिअर मार्गदर्शन व गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभ प्रसंगी बोलत होते. या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणुन ज्येष्ठ भिक्खुनी धम्मदिना आर्याजी, मुख्य मार्गदर्शक म्हणुन विनोद बागडे, प्रमुख वक्ते म्हणुन उमाकांत कांबळे, प्रा युवराज खोब्रागडे, महेंद्र बारसागडे, किर्ती बागडे,सुमन कान्हेकर, अर्चना मोटघरे यांसह अन्य मान्यवर उपस्थित होते.
ते पुढे म्हणाले, विद्यार्थ्यांनी त्यांचे शैक्षणिक आयुष्य जगत असतांना तणावमुक्त रहावे. शिकत असतानाच विद्यार्थ्यांनी ध्येय निश्चित करून ध्येय्याच्या दिशेने योग्य ती वाटचाल करावी. पालकांनी देखील विद्यार्थ्यांना समजून घेत त्यांच्या अडीअडचणी समजून घ्याव्या व त्यांना योग्य ते मार्गदर्शन करत रहावे असे देखील ते म्हणाले. विद्यार्थ्यांनी त्यांच्या आयुष्यात नीटनेटकेपणा, संयम, अभ्यासाचे नियोजन, अभ्यासाचे सातत्य,अभ्यासाबाबत वेळेचे नियोजन व समयसुचकता बाळगल्यास स्पर्धेच्या युगात नक्कीच यशाची पायरी गाठतील असे ठासुन सांगत विद्यार्थ्यांनी योग्य प्रशासन चालविण्यासाठी प्रशासकीय सेवेत येण्याचे आवाहन प्रा विनोद बागडे यांनी केले.
दरम्यान, या कार्यक्रमात इयत्ता बारावीतील विज्ञान विभागातून तालुक्यातून प्रथम आलेली श्वेता खरकाटे, द्वितीय आलेली अवंती घोरमोडे, तृतीय आलेली प्रांजली दिघोरे, बारावी कला शाखेतून तालुक्यातून प्रथम आलेली वैष्णवी बुराडे, तेजस्विनी भर्रे, तृतीय आलेली चांदणी परशुरामकर तर दहाव्या वर्गात तालुक्यातून प्रथम आलेली वैष्णवी बारस्कर, द्वितीय अवंती घावळे, तृतीय कुंजल रामटेके यांचा शॉल, पुष्पगुच्छ व बुद्ध आणि त्यांचा धम्म भेट देऊन सत्कार केला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक अरविंद मेश्राम, संचालन निर्भय गायकवाड यांनी केले तर आभार आशिष टेंभुरकर यांनी मानले.