भंडारा पत्रिका / प्रतिनिधी मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार ३० ते ४० आमदारांसह शिंदेफडणवीस सरकारमध्ये सामील झाले आहेत. आज सकाळी देवगीरी बंगल्यावर अजित पवारांनी समर्थक आमदारांची बैठक घेतली. त्यानंतर संबंधित आमदारांच्या सहीचे पत्र घेऊन अजित पवार राजभवनावर दाखल झाले. यानंतर काही वेळातच अजित पवारांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. अजित पवारांसह राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक वरिष्ठ नेतेही मंत्रीपदाची शपथ घेणार आहे. खरं तर, अलीकडेच अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदासाठी उत्सुक असल्याचे बोलले जात होते त्यासाठी अजित पवार आपल्या समर्थक आमदारांच्या वतीने पक्षावर दबाब टाकत होते, अशीही चर्चा सुरू होती. यानंतर आता अजित पवार राजभवनावर दाखल झाले. अजित पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. त्यांच्यासह राष्ट्रवादीच्या इतरही नेत्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. आता देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार दोघंही महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून काम करतील.
मंत्रीमंडळात सामील नेत्यांची यादी अजित पवार -उपमुख्यमंत्री छगन भुजबळ – मंत्री दिलीप वळसे-पाटील-मंत्री हसन मुश्रीफ- मंत्री धनंजय मुंडे- मंत्री धमार्रावबाबा आत्राम-मंत्री आदिती तटकरे- मंत्री संजय बनसोडे -मंत्री अनिल पाटील – मंत्री राष्ट्रवादीचे जवळजवळ सर्वच महत्त्वाचे नेते अजित पवार यांच्यासोबत आहेत. मात्र पहिल्या फळीतील खासदार सुप्रिया सुळे, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी मंत्री जितेंद्र आव्हाड, माजी मंत्री अनिल देशमुख आदी नेते मात्र अजित पवार यांच्या शपथविधीदरम्यान राजभवनात उपस्थित नव्हते. दरम्यान, अजित पवार यांच्या या बंडाला शरद पवार यांचा पाठिंबा नसेल, तर आगामी काळात राष्ट्रवादी पक्षाचे काय होणार? शरद पवार काय भूमिका घेणार? महाविकास आघाडीचे काय भवितव्य असेल? असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
अजित पवारांच्या बंडाला शरद पवारांचा पाठिंबा नाही
-राऊत अजित पवार यांच्या बंडखोरीनंतर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते संजय राऊत यांनी शरद पवार यांच्याशी चर्चा केली आहे. त्यानंतर संजय राऊत यांनी अजित पवार यांच्या बंडखोरीला शरद पवार यांचा पाठिंबा नाही, असे सांगितले आहे. मी खंबीर आहे. लोक आपल्या पाठीशी आहेत, असे शरद पवार यांनी संजय राऊतांना सांगितले आहे. शरद पवार यांच्याशी चर्चा केल्यानंतर संजय राऊत यांनी एक ट्वीट केले आहे. महाराष्ट्राच्या राजकारणाचे साफ मातेरे करण्याचा विडा काही लोकांनी उचलला आहे. त्यांना त्यांच्या मार्गाने जाऊ द्या. माझे आताच श्री. शरद पवार यांच्याशी बोलणे झाले. ते म्हणाले मी खंबीर आहे. लोकांचा पाठिंबा आपल्याला आहे.