भंडारा पत्रिका / प्रतिनिधी मुंबई : बनावट इंजिन आणि चेसिस क्रमांक असलेल्या असंख्य वाहनांच्या नोंदणी राज्यात झाल्याचे आढळून आले आहे. तसेच पराराज्यातील चोरींच्या वाहनांची नोंदणी सुद्धा करण्यात आल्याचे प्रकार राज्य परिवहन विभागाच्या निदर्शनास आले. अशा वाहनांना अटकाव घालण्यासाठी परराज्यातून येणाºया वाहनांच्या नोंदणीसाठी मानक संचालन प्रक्रिया (एसओपी) निश्चित केल्याचे राज्य परिवहन आयुक्त विवेक भीमनवार यांनी रविवारी सांगितले. तेलंगणा, अरुणाचल प्रदेश, नागालॅण्ड आणि इतर राज्यातून बनावट चेसिस आणि इंजिनक्रमांकासह चालणारे अनेक ट्रक व बसेससह इतर चारचाकी व दुचाकी वाहनांची राज्यातील प्रादेशिक परिवहन कार्यालयांमध्ये (आरटीओ) पुनर्नोंदणी झाल्याचे निदर्शनास आले आहे. याला अटकाव घालण्यासाठी प्रक्रियेचा अभाव होेता. त्यामुळे परराज्यातील वाहनांच्या नोंदणीसाठी नवी एसओपी निश्चित केल्याचे आयुक्त भीमनवार यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले. नव्या एसओपीतंर्गत आरटीओचे लिपिक ‘वाहन पोर्टल’वर वाहनांशी संबंधित माहिती भरेल त्यानंतर विभागाचे वरिष्ठ अधिकारी त्याची पडताळणी करून नोंदणीसाठी मान्यता देईल. वाहन नोंदणीतील त्रुटी ओळखून त्यात सुधारणा करण्यासाठी एसओपी आणल्याचे ते म्हणाले.