भंडारा पत्रिका / प्रतिनिधी नागपूर : शहरातील विविध समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी शहर काँग्रेसने आज महापालिका मुख्यालयावर मोर्चा काढला. यावेळी आंदोलकांनी आयुक्त कार्यालयासमोर घोषणा दिल्याने पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. नागपूर महापालिकेत प्रशासक आहे. लोकनियुक्त प्रतिनिधी नसल्याने जनतेचे प्रश्न योग्य प्रकारे हाताळले जात नाही. काही भागात पाणी पुरवठा नियमित होत नाही. तर काही भागाला पाण्याची टंचाई भासत आहे. शहरातील रस्ते, गल्ल्यांची साफसफाई नियमित केली जात नाही. पथदिवे वेळच्यावेळी बदलण्यात येत नाही. त्यामुळे कित्येक दिवस रस्त्यांवर अंधार असतो. या सर्व समस्यांचे फलक घेवून आंदोलकांनी मुख्य प्रवेशद्वारापासून आयुक्त कार्यालयाकडे निघाले. आयुक्त कार्यालयावर जोरदार नारे निर्देशने करण्यात आली, घोषणा देण्यात आल्या. यानंतर पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले. शहरातील सर्व विधानसभा क्षेत्रात शासनाच्या अमृत योजनेतंर्गत जलवाहिनी टाकण्यात आलेल्या आहेत. जलवाहिनीसाठी खोदण्यात आलेल्या नाल्यांच्या उरलेला व रस्त्याच्या कडेला असलेला मलबा उचलण्यात न आल्याने रहदारीसाठी घातक ठरत आहे. वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. अपघात होत आहेत. परंतु प्रशासन याकडे लक्ष देत नाही, असा आरोप आमदार विकास ठाकरे यांनी केला.