भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : महाविकास आघाडी सरकारमधील थांबलेला निर्णय दिनांक ११ जुलै २०२३ ला सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने कार्यान्वित झाला असून आता महाराष्ट्र विधान परिषदेत राज्यपाल नियुक्त १२ सदस्यांची वर्णी लागणार आहे. या बातमीने भंडारा जिल्ह्यात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. या राज्यपाल नियुक्त १२ सदस्यांमध्ये भंडारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष सुनील फुंडे यांनाही सदस्य म्हणून स्थान मिळणार असल्याची माहिती सूत्रांकडून कळते आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये राज्यपाल असलेले भगतसिंग कोश्यारी यांनी प्रलंबित ठेवलेला विधान परिषद सदस्यांच्या नियुक्तीचा प्रश्न सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने लवकरच मार्गी लागणार आहे. १२ विधान परिषद सदस्य राज्यपालांच्या मर्जीनुसार निवडले जाणार आहे. यात भारतीय जनता पार्टीला ६ सदस्य, शिंदे गटाला ३ सदस्य आणि अजित पवार गटाला ३ सदस्य निवडीचा योग जुळून आलेला आहे. सध्याच्या महाराष्ट्राच्या राजकारणात भारतीय जनता पार्टी, एकनाथ शिंदे गट आणि अजित पवार गट यांचे सरकार असून राज्यपालांच्या हस्ते १२ सदस्य विधान परिषदेसाठी निवडण्याचा प्रश्न मार्गी लागला आहे.
जिल्ह्यात खासदार प्रफुल्ल पटेल यांचे खास विश्वासू असलेले सुनील फुंडे, माजी आमदार राजेंद्र जैन यांचे नाव वरचढ असून सध्याच्या अजित पवार गटाचे सर्वेसर्वा असलेले प्रफुल्ल पटेल यांनी सुनील फुंडे यांच्या नावाची शिफारस आघाडी सरकारमध्ये असतांनाच राज्यपालाकडे केल्याचे समजते. परंतु महाविकास आघाडी सरकार आणि राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यात निर्माण झालेल्या अंतर्गत वादामुळे हा प्रश्न मार्गी लागला नव्हता, परंतु दिनांक ११ जुलै २०२३ रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार राज्यपाल रमेश बैस यांना १२ सदस्य नियुक्त करावयाची आहे. त्यात भंडारा जिल्ह्यात जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष सुनील फुंडे हे खासदार प्रफुल्ल पटेल यांच्या सर्वात जवळचे असल्यामुळे विधान परिषद सदस्यांची माळ सुनील फुंडे यांच्या गळ्यात पडेल हे मात्र सुनिश्चित.
सुनील फुंडे यांच्या आजवरच्या राजकारणातला अनुभव लक्षात घेतला तर त्यांना १६ वर्षे भंडारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष आणि १० वर्षे जिल्हा दुग्ध उत्पादक सहकारी संघात चांगल्या प्रकारे काम सांभाळले आहे. याच माध्यमातून त्यांनी केलेली कामे, समाजात प्रत्येकाला जुळवून ठेवण्याची कसब या सर्वांच्या माध्यमातून जिल्ह्यात पटेलांनंतर राष्ट्र- वादी काँग्रेस सुनील फुंडे यांनी व्यवस्थित सांभाळली आहे, त्यामुळे त्यांची वर्णी लागणार आणि जिल्ह्याचा विकास त्यांच्या माध्यमातून अविरत चालू राहणार, हे विशेष.