भंडारा पत्रिका/वार्ताहर सिल्ली : पावसाळा सुरू झाला की त्यापाठोपाठ रस्त्यावर पडणारे खड्डे ही समस्या आलीच, वर्षानुवर्षे हाच अनुभव. जुलैपासून सुरू झालेल्या पावसामुळे सिल्ली ते आंबाडी या रस्त्यांचे भीषण चित्र पाहता रस्त्यात खड्डे आहेत की खड्डयांत रस्ता आहे, असा प्रश्न पडतो. सिल्लीवरुन आंबाडीकडे जाणाºया मुख्य रस्त्यावर आंबाडी गावाजवळ जागो जागी मोठमोठे खड्डे पडले असून नागरिकांना जीव धोक्यात घालून प्रवास करण्याची वेळ आली आहे.
भंडारा तालुक्यात आंबाडीवरून आंभोरा, सिल्ली, मानेगावं, झबाडा, बोरगाव, तिड्डी, मकरधोकडा, टेकेपार इत्यादी गावाला जोडणारा मुख्य रस्ता असून याच रस्त्यावरून भंडारा ते आंभोरा अशी नागरिकांची रोज मोठया प्रमाणात रहदारी असते. भंडारा हे जिल्ह्याचे ठिकाण आहे. त्यामुळे परिसरातील अनेक नागरिकांचे दैनंदिन कामे, सरकारी कामे, शिक्षण घेणारे विद्यार्थी तसेच कुटुंबाचे उदरनिर्वाह करीता मजुरी करण्यासाठी स्वत: चे दुचाकीने प्रवास करीत असणाºया कामगारांना याच खड्डे पडलेल्या रस्त्यावरून रात्री अपरात्री प्रवास करावा लागतो. मात्र सिल्ली ते आंबाडी या अर्धा किमी अंतराच्या आंबाडी गावाजवळील मुख्य रस्त्यावर अनेक दिवसापासून जागोजागी मोठं मोठे खड्डे पडले असून पावसाळ्यात या खड्डयामध्ये पाणी भरले असते. त्यामुळे अनेकदा नागरिकांना खड्डयाचा अंदाज येत नाही. यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले असून रोज या खड्डयामध्ये प्रवास करतांना नागरिकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. करीता या रस्त्यावरील खड्डे बुजवावे, अशी सिल्ली परिसरातील नागरिकांनी मागणी केली आहे.