भंडारा पत्रिका / प्रतिनिधी अर्जुनी मोरगाव : तालुक्यात एकमेव ग्रामपंचायत येरंडी/देवलगावची सार्वत्रिक निवडणूक आज,५ नोव्हेंबर रोजी शांततेत पार पडली. निवडणुकीत ८८.०७ टक्के मतदान झाल्याची माहीती तहसीलदार अनिरुद्ध कांबळे यांनी दिली आहे. गोंदिया जिल्ह्यात येरंडी देवलगाव हे गाव राजकियदृष्टया अत्यंत महत्वाचे गाव असून. तालुक्यात एकमेव ग्रामपंचायत येरंडीची निवडणूक असल्याने संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले होते. येथील निवडणूक अविरोध व्हावी यासाठी बराच प्रयत्न करण्यात आला. एकेकाळी कट्टर प्रतिस्पर्धी समाजले जाणारे दहीवले व खोब्रागडे/शिवनकर पॅनल एकत्र आल्याने निवडणूक अविरोध होणार असे चित्र असताना तिसरी आघाडी तयार झाल्याने गावाला निवडणुकीला सामोरे जावे लागले. मात्र कट्टर प्रतिस्पर्धी यांनी संयुक्त निवडणूक लढविली, हे येथे उल्लेखनीय.
९ सदस्य व १ सरपंच पदासाठी निवडणुक घेण्यात आली. मात्र दहीवले व खोब्रागडे/शिवनकर पॅनलचे ३ उमेदवार यापुर्वीच अविरोध निवडून आले होते. त्यामुळे सरपंचपदासाठी ३ उमेदवार व ६ सदस्य पदासाठी १२ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. निवडणूक अत्यंत शांततेत पार पडली असून कायदा व सुव्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी नवेगावबांध पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. निवडणूक प्रक्रिया यशस्वीपणे पार पाडण्यासाठी तहसिल प्रशासनाने योग्य नियोजन केले होते. आता कोणती पॅनल बहुमताने बाजी मारते हे ७ नोव्हेंबर रोजी मतमोजणीनंतर कळणार आहे.