भंडारा पत्रिका/प्रतिनिधी चंद्रपूर : क्रांतीसूर्य भगवान बिरसा मुंडा यांचे व्यक्तिमत्त्व वाघानेही हेवा करावा असे होते. आज त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण करताना अभिमानाने उर भरून आला आहे. पण एवढ्यावर थांबता येणार नाही. भगवान बिरसा मुंडा यांनी स्वराज्याचा संकल्प केला होता, आपल्याला हा संकल्प सुराज्याच्या दिशेने घेऊन जायचा आहे. आणि त्यासाठी त्यांचा विचार पुढे नेणे ही काळाजी गरज आहे, असे प्रतिपादन राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांनी केले. चंद्रपूर येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भगवान वीर बिरसा मुंडा यांच्या १२ फुटी पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण ना. मुनगंटीवार यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.
भाजपा अनुसुचित जमाती मोर्चा महानगर चंद्रपूर तसेच आदिवासी समाजातील विविध संघटनांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी शिरपूरचे गोंड राजे केशवशहा आत्राम, भाजपा जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा,माजी जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे, भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष राहुल पावडे, प्रमोद कडू, अशोक तुमराम, माजी जिल्हा परिषद समाज कल्याण सभापती ब्रिजभूषण पाझारे, भाजपा प्रदेश महिला महामंत्री अल्का आत्राम, धनराज कोवे, चंद्रकला सोयाम, नामदेव डाहुळे, आशीष देवतळे, मायाताई उईके, शितल आत्राम, शितल कुळमेथे, गंगूबाई मडावी, शुभम गेडाम, किशोर आत्राम, अरविंद मडावी, यशवंत सिडाम, विक्की मेश्राम, विजय पेंदोर आदींची प्रमुख उपस्थिती होती. ना. सुधीर मुनगंटीवार पुढे म्हणाले, ‘आज समाजा-समाजात द्वेष निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे देशापुढे जल, वायू, ध्वनी प्रदूषणाचे आव्हान आहेच, मात्र त्यासोबत विचार प्रदूषणाचेही मोठे आव्हान आहे. २१ व्या शतकात तंत्रज्ञानाने आयुष्य बदलले, पण मानसिक स्वास्थ बिघडले हे खरे आव्हान आहे. त्यावर मात करायची असेल तर मी वाईट वागणार नाही, मी प्रामाणिकपणे आयुष्य जगेन, दुसºयाची रेष पुसणार नाही स्वत:ची रेष मोठी करेन, असा संकल्प करावा लागेल. हा संकल्प करण्याची प्रेरणा बिरसा मुंडा यांच्या विचारांमधून मिळणार आहे.’ कर्तृत्व दाखवायचे असेल, अन्यायाविरुद्ध एल्गार करायचा असेल तर वय आडवे येत नाही, याचे सर्वांत मोठे उदाहरण म्हणजे क्रांतीवीर बिरसा मुंडा आहेत, असेही ना. मुनगंटीवार म्हणाले.
१५ नोव्हेंबर १८७५ ला त्यांचा जन्म झाला आणि अवघे २५ वर्षांचे आयुष्य ते जगले. त्यातही त्यांनी इंग्रजांच्या विरुद्ध युद्ध पुकारले. १९४२ ला भारत छोडो आंदोलन झाले, पण खरा एल्गार बिरसा मुंडा यांनी केला. ‘अंग्रेजो अपने देश वापस जाओ, हमारा देश हमारा राज, अशी गर्जना त्यांनी दिली. भारतीयांच्या मनात त्यांनी हा भाव पोहोचवला,’ असे ते म्हणाले. समाजासाठी बलिदान देण्याची भगवान बिरसा मुंडा यांची वृत्ती आदर्श असल्याचे सांगत ना. मुनगंटीवार म्हणाले, ‘भगवान बिरसा मुंडा यांना शिकायचे होते. त्यांच्यात शिक्षण घेण्याची जिद्द होती. त्यावेळी जर्मन मिशनरी शाळेत त्यांना प्रवेश घ्यावा लागला. पण दुर्दैवाने या शाळेने सर्वांत मोठी अट ठेवली ती म्हणजे धर्मांतरण करण्याची. बिरसा मुंडा यांनी काही महिन्यांसाठी धर्मांतरण केलेही. पण एक दिवस शाळेतील एका शिक्षिकेने जेव्हा त्यांच्या समाजासाठी अपशब्द वापरले तेव्हा बिरसा मुंडा उठले आणि त्यांनी एल्गार केला. शाळेतून बाहेर पडताना त्यांनी जबरदस्तीने लागलेला धर्मही सोडला. आज विविध देश भारताच्या प्रगतीकडे वक्रदृष्टी ठेवून आहेत. त्यांच्या संघटना भारतात विषारी विचार पसरवत आहेत. पण बिरसा मुंडा यांच्यापासून प्रेरणा घेत आपणसावध राहिले पाहिजे.’ यावेळी त्यांनी अशोक तुमराम व त्यांच्या संपूर्ण टीमचे पूणार्कृती पुतळ्याच्या उभारणीसाठी अभिनंदन केले.