भंडारा पत्रिका/वार्ताहर सिल्ली : वातावरणात अचानक बदल आल्याने काही दिवसांपूर्वी उबदार वातावरण जाणवत असताना, आता अवकाळी पावसामुळे भंडारा जिल्ह्यात थंडीने जोर धरल्याचे दिसून येत आहे. पावसामुळे दिवसाही थंडीचा जोर वाढला असून वातावरणात हुडहुडी पसरल्याने शहरासह गावागावात शेकोट्या पेटू लागल्या आहेत. गत आठवडाभर ढगाळ वातावरणामुळे दमट वातावरणाची अनुभूती होती. असे असतानाच सोमवारी पावसाने हजेरी लावली व थंडीचा जोर वाढला होता. मात्र, मंगळवारी (दि. २८) सकाळपासूनच दमदार पाऊस बरसला व त्यामुळे थंडीचा चांगलाच जोर वाढला होता. यामुळे दिवसाही नागरिकांना गरमीसाठी शेकोटी पेटविण्याची पाळी आली होती. अचानकच थंडीचा जोर वाढला व त्यात पावसामुळे विशेषत: लहान बालके व वृद्धांना त्रास सहन करावा लागत आहे, तर शहरासह ग्रामीण भागातील नागरिक थंडीपासून बचाव करण्यासाठी शेकोटीचा आधार घेताना निदर्शनास येत आहे. कपाटात ठेवलेले उनी कापडांचा वापर वाढला असून, काळजी घेतली जात आहे.
गत काही दिवसांपासून जिल्ह्यात छान थंडी पडली आहे. त्यामुळे पिके बहरण्यास सुरुवात झाली आहे, थंडीमुळे रब्बी पिकास पोषक असे वातावरण निर्माण झाले आहे. वाढती थंडी पाहता शेतकरी सुखावला आहे. गहू, ज्वारी, हरभरा पिके आता बहरताना दिसत आहेत. या थंडीचा रब्बी पिकांसाठी चांगला फायदा होणार आहे. हवामान खात्याने अवकाळी पावसाचा अंदाज वर्तविला होता व त्यानुसार, मंगळवारी अवकाळी पावसाने दमदार हजेरी लावली. मात्र, आता हवामान खात्याने बुधवारीही पाऊस पडन्याचा अंदाज वर्तविला असल्याने बुधवारीही पाऊस बरसल्यास थंडीचा जोर आणखी वाढणार आहे. वातावरणातील या बदलामुळे सकाळी फिरायला जाणाºया लोकांना सर्दी, खोकल्याचाही त्रास होऊ शकतो. त्या दृष्टीने सतर्कता म्हणून तोंडाला मास्क अथवा रुमाल बांधूनच फिरायला जावे.