भंडारा पत्रिका / प्रतिनिधी साकोली : सततच्या नापिकीमुळे व आर्थिक टंचाईला कंटाळून लाखनी तालुक्यातील मौजा मिरेगाव येथील शेतकºयाने शेतातीलच झाडाला नायलान दोरीने गळफास लावून आत्महत्या केल्याची बाब आज सकाळी (३० नोव्हेंबर ) रोजी उघडकीस आली. याघटनेमुळे गावात एकच खळबळ उडाली आहे. प्राप्त माहीतीनुसार मिरेगाव येथील शेतकरी मृतक प्रेमदास रामा मेश्राम वय (४२) वर्ष यांच्याकडे ०.४० आर शेतजमीन आहे. त्याने खरीप हंगामात धानपिकाची लागवड केली होती व धानपिक आल्यानंतर त्याची आदल्या दिवशीच मळणी पण केली. परंतु धानपीक कमी झाल्यामुळे व उत्पादन खर्चही न निघाल्यामुळे मृतक शेतकरी चिंतातुर होता. शेतात ठेवलेले धानाचे पोते सुरक्षित राहावे म्हणून जागली करण्यासाठी शेतावर जातो असे सांगून तो 29 नोव्हेंबर रोजी रात्री ८:३० वाजता जेवण आटोपून घरून निघून गेला.
सकाळी मृतकाचा मुलगा धानाचे पोते आणण्यासाठी भाड्याचा ट्रक्टर घेवून शेतात गेला असता त्याला त्याचे वडील झाडाला गळफास लावलेल्या स्थितीत आढळले. घटनेची माहीती गावात पसरताच साकोली पोलीस स्टेशनला घटनेची माहीती दिली व काही कालावधीतच साकोली पोलीस स्टेशनचे ठाणेदार आपल्या ताफ्यासह घटनास्थळी दाखल झाले. मृतकाचा पंचनामा करून शवविच्छेदनासाठी साकोली उपजिल्हा रूग्णालयात पाठविण्यात आले. घटनास्थळी सोनमाळा तलाठी साझा चे तलाठी योगीराज डांबरे सुद्धा दाखल झाले व त्यांनी धान्याचा पंचनामा केला. मृतक शेतकरी हा अल्पभूधारक असून त्याच्या पश्चात म्हातारी आई , पत्नी व दोन मुले आहेत. मृतकाची ” शेतकरी आत्महत्या प्रकरण” म्हणून शासनदरबारी नोंद करून मृतक शेतकºयाच्या कुटुंबियाला आर्थिक मदत करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.