भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : शेतमालाचे नुकसान होऊनही पीक विमा कंपनी कडून भरपाई मिळत नसल्याने संतप्त झालेल्या एका शेतकयांने तब्बल दोन एकरातील धानाच्या पुंजण्याला आग लावली. तर दुस-याने शेतातील उभ्या धान पिकाला आगीच्या स्वाधीन केले. सच्चीदानंद देवराम लेंडारे व गंगाधर खोब्रागडे अशी धान पिकाला आग लावणा-या शेतक-यांची नावे आहेत. हा प्रकार ओबीसी क्रांती मोचार्चे संजय मते यांच्या पुढाकारात शासन व पीक विमा कंपनीचा निषेध करण्यासाठी भंडारा तालुक्यातील वाकेश्वर येथे घडविण्यात आला.
यंदाच्या खरीप हंगामात शेतक-यांनी धान पिकाची लागवड केली. यासाठी विविध बँक, सेवा सहकारी संस्थेसह खाजगी व्यक्तींकडून हातउसने पैसे देखील घेतले होते. मात्र ऐन धान कापणीच्या तोंडावर असताना अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने शेतक-यांचे मोठे नुकसान झाले. याबाबत पीक विमा काढलेल्या शेतकयांनी भरपाई मिळण्यासाठी विमा कंपनीकडे तक्रार केली. प्रशासनाने नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे देखील केले. मात्र महिनाभरापेक्षा अधिक कालावधी लोटूनही कुठलीही नुकसान भरपाई मिळालेली नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या शेतक-यांनी आपल्या शेतातील धान पिकाला आग लावून पीक विमा कंपनीसह शासनाचा निषेध नोंदविला.