भंडारा पत्रिका / प्रतिनिधी मुंबई : खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली कन्याकुमारी ते काश्मीर या भारत जोडो यात्रेला देशभरातून अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला होता. आता १४ जानेवारीपासून मणिपूर ते मुंबई भारत जोडो न्याय यात्रा सुरु होत आहे. भारत जोडो यात्रेतून देश जोडण्याचे जे काम झाले तेच काम या यात्रेतूनही होणार असून जनतेच्या न्याय हक्काला वाचा फोडण्याचे काम या यात्रेतून होईल. भारत जोडो न्याय यात्रेलाही जनतेचा मोठा प्रतिसाद मिळेल व देशातील वातावरण ढवळून निघेल, असा विश्वास महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसकमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केला आहे. भारत जोडो न्याय यात्रेच्या तयारीसंदर्भात दिल्ली येथे अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या कार्यालयात बैठक झाली या बैठकीनंतर प्रसार माध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, भारत जोडो यात्रेने देश तोडणाºयांना सडेतोड उत्तर दिले आहे.
या यात्रेतून राहुलजी गांधी यांनी सर्व समाजघटकांच्या वेदना, समस्या व त्यांच्या व्यथा ऐकून घेतल्या. आता पुन्हा मणिपूरपासून १४ जानेवारीला भारत जोडो न्याय यात्रा सुरु होत आहे. ही यात्रा ६६ दिवस, ११० जिल्हे ६७१३ किलोमीटरचे अंतर पार करणार असून महाराष्ट्रात मालेगाव, नाशिक, ठाणे, मुंबई असे ५ दिवस, ६ जिल्हे व ४७९ किमीचा प्रवास करणार आहे. भारत जोडो न्याय यात्रा यशस्वी करण्यासंदर्भात दिल्लीतील बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपासंदर्भात आजच्या बैठकीत चर्चा झालेली नाही. जागा वाटपासंदर्भात महाविकास आघाडीत कसलेही मतभेद नसून शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्याशी यासंदर्भात चर्चा झालेली आहे. जागा वाटपासंदर्भात सर्वात मोठी आग तर महायुतीत लागलेली आहे ती निवडणुकीत समोर येईल. जागा वाटपासदंर्भात मुकुल वासनिक यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आलेली असून दोन चार दिवसात या समितीच्या बैठका होतील.