भंडारा पत्रिका/प्रतिनिधी गोंदिया : महाराष्ट्र राज्य वीज मंडळ कंत्राटी कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्या बॅनरखाली राज्यातील २५ हून जास्त कामगार संघटनांनी बुधवार २१ पासून राज्यभरात धरणे आंदोलन सुरू केले आहे. तर २९ फेब्रुवारी रोजी रात्रीपासून ४८ तास कामबंद आंदोलनाला सुरवात करण्यात आली आहे. यातंर्गत येथील रामनगर स्थित महावितरण कार्यालयापुढे कंत्राटी कामगारांनी सुरू केले आहे. महावितरण, महानिर्मिती, महापारेषणचे कंत्राटी कर्मचारी बुधवारी सकाळी मोठ्या संख्येने रामनगर येथील महावितरण कार्यालयापुढे जमले.
येथे सगळ्यांनी सरकार व वीज कंपन्यांच्या विरोधात घोषणाबाजी करत धरणे सुरू केले. याप्रसंगी स्थायी होणे आमच्या हक्काचे, आमचे अधिकार आम्हाला द्यावेच लागणारसह इतरही घोषणा देण्यात आल्या. स्थायी झाल्याशिवाय माघार घेणार नसल्याचेही आंदोलकांनी सांगितले. २९ फेब्रुवारीपासून राज्यभरात ४८ तास कामबंद आंदोलन सुरु झाले आहे. त्यानंतरही सरकारने मागण्या मान्य न केल्यास ५ मार्चपासून बेमुदत कामबंद करणार असल्याचे संयुक्त कृती समितीकडून स्पष्ट करण्यात आले आहे. या आंदोलनाला गोंदिया जिल्हा काँगेसनेही पाठिंबा दिला असून जिल्हाध्यक्ष दिलीप बनसोड यांनी आंदोलकांची भेट घेत आंदोलक अशोक ठवकर, धर्मेंद्र बोरकर, सुरेश तितरे, नामदेव चौधरी, आशिष बनोटे, देवेंद्र लटये, दिलीप रहागंडाले, रोहीत हलमारे, मिथून कोचे, अंकित मिश्रा यांच्याशी चर्चा केली.