भंडारा पत्रिका / प्रतिनिधी नागपूर :- कौटुंबिक हिंसाचारा सारख्या घटना रोखण्यासाठी कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करणे व त्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन सामूहिक प्रयत्न करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव व न्यायाधीश सचिन स. पाटील यांनी केले. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश डी. पी. सुराणा यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा विधी सेवा प्राधिकरण नागपूर आणि जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय यांचे संयुक्त विद्यमाने कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियम २००५ या कायद्याची प्रभावी अंमबजावणी होण्यासाठी जिल्हा परिषदेच्या खेडकर सभागृहात आयोजित कार्यशाळेमध्ये ते बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी महिला व बाल विकास विभागाच्या उपायुक्त अपर्णा कोल्हे या होत्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक भारती मानकर यांनी केले. डॉ. सुशीला तकभोरे यांनी भारतीय समाजात महिलांचे स्थान व दर्जा आणि जिल्हा बार असोशिएशनचे अध्यक्ष अॅड. रोशन बागडे यांनी कायद्याच्या अंमलबजावणीसाठी क्षमता बांधणी या विषयावर मार्गदर्शन केले.