नक्षल्यांचा घातपाताचा डाव उधळला; छत्तीसगड सीमेवरील तळ उध्वस्त

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी गडचिरोली : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात सक्रिय झालेल्या नक्षल्यांचा घातपात घडवून आणण्याचा डाव उधळून लावत गडचिरोली पोलिसांनी त्यांचा तळ उध्वस्त केला आहे. एटापल्ली व धानोरा तालुक्याच्या शेवटच्या टोकावर छत्तीसगड सीमेलगतच्या टेकडीवर नक्षल्यांनी तळ बनवला होता. पोलीस कारवाईची कुणकुण लागताच नक्षलवाद्यांनी पळ काढला. यावेळी परिसरातून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा व साहित्य जप्त केले. लोकसभा निवडणुकीत घातपात घडविण्याच्या उद्देश्याने एटापल्ली आणि भामरागड तालुक्याला लागून असलेल्या छत्तीसगड सीमाभागात जवळपास दहा ते बारा जहाल नक्षलवादी सक्रिय झाले आहे. काही दिवसांपूर्वी रेपनपल्ली हद्दीत झालेल्या चकमकीत पोलिसांनी चार नक्षल्यांना कंठस्नान घातले होते.

गुरुवारीदेखील छत्तीसगड सीमेवर मध्यरात्री सहा तास चकमक झाली. यानंतर २९ मार्चला पहाटे अहेरी तालुक्यातील अतिदुर्गम दामरंचा येथे अशोक तलांडी या आदिवासी तरुणाचा ताडगावजवळ गळा आवळून हत्या करत नक्षल्यांनी पत्रक टाकले होते. दरम्यान, पेंढरीपासून १२ किलोमीटरवर पूवेर्ला छत्तीसगडच्या मानपूर जिल्ह्यातील चुटीनटोला गावाजवळ ४५० मीटर उंच पहाडीवर नक्षलवादी तळ ठोकून असल्याची गोपनीय माहिती मिळताच पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी ३० मार्च रोजी नक्षलविरोधी अभियान गतिमान केले. अपर अधीक्षक यतीश देशमुख यांच्या नेतृत्वाखाली सी६० जवानांनी अतिशय खडतरपणे ही अवघड पहाडी पार करून नक्षल्यांचा तळ उध्वस्त केला. पोलिसांचा आक्रमक पवित्रा बघून नक्षल्यांनी पळ काढला. कॉर्डेक्स वायर, डिटोनेटर, जिलेटिन स्टिक्स, बॅटरी, वॉकी टॉकी चार्जर, बॅकपॅक असे साहित्य जप्त केले आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.