
भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : ओबीसी समाजाच्या न्याय्य हक्कासाठी आणि जातिनिहाय जनगणनेच्या मागणीसाठी रविवारी, २२ मार्च २०२६ रोजी भंडारा शहरात ‘सकल ओबीसी महामोर्चा’ चे आयोजन करण्यात आले आहे. या महामोचार्ला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) भंडारा जिल्ह्याच्या वतीने जाहीर पाठिंबा देण्यात आला असून, सर्व ओबीसी बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन नेते चरण वाघमारे यांनी केले आहे. भंडारा येथील दसरा मैदान ते जिल्हाधिकारी कार्यालय या मार्गावर सकाळी १०.०० वाजता हा मोर्चा निघणार आहे. २०२७ च्या जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र कॉलम नसल्याने या समाजाचा अधिकृत डेटा सरकारकडे उपलब्ध होणार नाही, ज्यामुळे भविष्यात आरक्षण आणि कल्याणकारी योजनांच्या अंमलबजावणीत अडचणी येऊ शकतात.
हीच बाब लक्षात घेऊन ‘सकल ओबीसी जनगणना झालीच पाहिजे’ या मागणीसाठी हा एल्गार पुकारण्यात आला आहे. या संदर्भात बोलताना चरण वाघमारे म्हणाले की, “ओबीसींची जनगणना ही केवळ तांत्रिक बाब नसून तो समाजाच्या अस्तित्वाचा आणि हक्काचा लढा आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) या मागणीसाठी पूर्णपणे आग्रही आहे. लोकशाहीत संसाधनांचे वाटप लोकसंख्येच्या प्रमाणात होणे आवश्यक आहे आणि त्यासाठी जातिनिहाय जनगणना हाच एकमेव मार्ग आहे. वाघमारे यांनी पुढे आवाहन केले की, “या ऐतिहासिक लढ्यात सहभागी होण्यासाठी सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि विशेषत: सर्व ओबीसी बांधवांनी राजकीय पक्षभेद विसरून एकत्र येणे काळाची गरज आहे. आपल्या येणाºया पिढ्यांच्या भविष्यासाठी आणि हक्काच्या आरक्षणासाठी प्रत्येकाने या महामोर्चात सामील व्हावे.