
भंडारा पत्रिका/ प्रतिनिधी भंडारा : तालुक्याच्या गणेशपूर येथील गांधी वॉर्डातील पुरातन सार्वजनिक विहिरीभोवती झालेल्या अतिक्रमणामुळे ग्रामस्थांना पाणी भरण्यास व येण्या-जाण्यास मोठा अडथळा निर्माण होत असून, या गंभीर प्रश्नावर वारंवार दाद मागूनही प्रशासनाने कोणतीही कार्यवाही न केल्याने अखेर दिनेश चिंतामण भुरे यांनी आपल्या सहकाºयांसह १६ मार्च २०२६ पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे. मे २०२५ पासून दिनेश भुरे आणि इतर ग्रामस्थांनी ग्रामपंचायत गणेशपूर व प्रशासनाकडे या अतिक्रमणाबाबत सतत पाठपुरावा केला होता, मात्र ग्रामपंचायत आणि संबंधित प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी आता उपोषणाचे हत्यार उपसले असून, या उपोषणाला १७ मार्च रोजी जनसेवक तथा समाजसेवक पवन मस्के यांनी आपला जाहीर पाठिंबा दिला आहे. पवन मस्के यांनी याप्रकरणी जिल्हाधिकारी, भंडारा यांच्याशी थेट चर्चा करून विनाविलंब तोडगा काढण्याची मागणी केली असून, जर या समस्येवर त्वरित ठोस कार्यवाही झाली नाही, तर सर्व जनतेला सोबत घेऊन तीव्र ‘जन आंदोलन’ छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. या उपोषण प्रसंगी जनसेवक पवन मस्के, दिनेश भुरे यांच्यासोबत कमलेश हरडे, भावेश नागपुरे, कैलास सोनकुसरे, गजानन मेहर व अनेक ग्रामस्थ उपस्थित होते, आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष जिल्हा प्रशासनाच्या भूमिकेकडे लागले आहे.