
भंडारा पत्रिका / प्रतिनिधी मुंबई : महराष्ट्रात वाढत्या तापमानाच्या अनुषंगाने आणि हवामान विभागाने अलर्ट जारी केल्यानुसार राज्य उष्णता कृती आराखडा जाहीर करण्यात आला आहे. यात असंघटित कामगारांना तीव्र उष्णतेपासून वाचवण्यासाठी महराष्ट्रात सरकारने नियमावली जाहीर केली आहे. या नियमांनुसार हवामान खात्याच्या अलर्टनुसार दुपारी १२ ते ४ या वेळेत कामगारांना विश्रांती देणे बंधनकारक असेल. तसेच कामाची वेळ सकाळी ६ ते ११ आणि सायंकाळी ४ ते ८ करण्याबाबत सुचवण्यात आले आहे. देशातील उष्णतेसाठी सर्वाधिक संवेदनशील राज्यांमध्ये महराष्ट्राचासमावेश होत असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. उष्माघात आणि आपत्ती या प्रकारामध्ये देशातील पहिल्या १० राज्यांमध्ये महराष्ट्राचा नंबर येतो.यासंदर्भात बोलताना आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितलं की, देशातील दहा प्रमुख उष्ण राज्यांमध्ये महराष्ट्र राज्याचाही समावेश आहे. वातावरणातील बदलांमुळे तापमान सातत्याने वाढत असून अनेक भागात तापमान ४७ ते ४९ अंश सेल्सियसपर्यंत पोहोचत आहे. राज्यात वाढत्या उष्णतेमुळे दक्षता घेण्याच्या सूचना राज्यातील सर्व जिल्हाधिकारी आणि आपत्ती व्यवस्थापन विभागांना देण्यात आल्या आहेत.