२६ शेळ्यांचा फडशा पाडणारा बिबट्या वनविभागाकडून जेरबंद

भंडारा : जिल्ह्यातील अड्याळ वनपरिक्षेत्रांतर्गत येणाºया नेरला गावात बिबट्याने धुमाकूळ घालत एकाच गोठ्यातील २६ शेळ्यांना ठार केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. ४ मे २०२६ रोजी पहाटेच्या सुमारास ही घटना घडली. मात्र, वनविभागाने तत्परता दाखवत अवघ्या काही तासातच या बिबट्याला जेरबंद केले आणि पुन्हा नैसर्गिक अधिवासात सोडले. नेरला येथील शेतकरी श्यामराव श्रीराम लोहारे यांचा गोठा जंगलाला लागून आहे. ४ मे रोजी पहाटे ४ वाजेच्या सुमारास बिबट्याने या शेडमध्ये घुसून हल्ला चढवला. या हल्ल्यात १२ बकरे आणि १४ शेळ्या अशा एकूण २६ जनावरांचा मृत्यू झाला. सकाळी ही घटना उघडकीस येताच परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते.

घटनेची माहिती मिळताच अड्याळचे वनपरिक्षेत्र अधिकारी योगेश शर्मा, क्षेत्र सहाय्यक आर.आर. दुणेदार, बीट रक्षक एन.जी. श्रीरामे आणि जलद बचाव दलाचे सदस्य तातडीने घटनास्थळी पोहोचले. पशुधन विकास अधिकारी मिसलवार यांनी मृत शेळ्यांचे शवविच्छेदन केल्यानंतर, सर्व मृत जनावरांना खड्डा करून गाडण्यात आले. वनविभागाच्या पथकाने परिसरात बिबट्याचा शोध सुरू केला असता, दुपारी ३ वाजेच्या सुमारास बिबट्या पुन्हा दिसून आला. त्याल पकडण्यासाठी तातडीने पिंजरा लावण्यात आला आणि रात्री ८ वाजेच्या सुमारास बिबट्याला यशस्वीरित्या जेरबंद करण्यात आले. तो बिबट्या सुदृढ असल्याची खात्री केल्यानंतर त्याला सुरक्षितरीत्या नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले आहे.

ही कारवाई उपवनसंरक्षक योगेंद्र शर्मा सिंग आणि सहाय्यक वनसंरक्षक सचिन निलक यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी योगेश शर्मा, रमेश दुणेदार, निलेश श्रीरामे, संदीप भुसारी, राकेश कोदाणे आणि जलद बचाव दलाच्या जवानांनी फत्ते केली. बिबट्या पकडल्या गेल्याने ग्रामस्थांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे. दरम्यान नुकसान झालेल्या पशुपालकाने योग्य नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *