
भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : तालुक्यातील गोपीवाडा येथील शेतशिवारात गुरुवारी दुपारी आलेल्या भीषण वादळामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. दि. २८ मे रोजी सुमारे दुपारी १.३० वाजताच्या दरम्यान आलेल्या जोरदार वादळाने शेतांमध्ये बसविण्यात आलेले सोलर पॅनल अक्षरश: हवेत उडाले. तसेच शेतातील साहित्य ठेवण्यासाठी बांधण्यात आलेल्या झोपड्याही वादळात उडून गेल्या. या घटनेत शेतकºयांचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
माहितीनुसार, महावितरण कंपनीतर्फे बसविण्यात आलेल्या सोलर प्लेटना मोठ्या प्रमाणात फटका बसला असून अनेक सोलर पॅनल तुटले आहेत. काही ठिकाणी संपूर्ण सोलर संरचना कोसळल्याचे चित्र पाहायला मिळाले. अचानक आलेल्या या वादळामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.आधीच नैसर्गिक संकटे, वाढते उत्पादन खर्च आणि आर्थिक अडचणींमुळे शेतकरी संकटात सापडलेले असताना या वादळामुळे त्यांच्या अडचणीत आणखी भर पडली आहे. हंगामाच्या तोंडावर झालेल्या या नुकसानीमुळे शेतकरी चिंतेत आहेत.दरम्यान, नुकसानग्रस्त शेतकºयांनी प्रशासनाकडे तात्काळ पंचनामा करून नुकसानभरपाई देण्याची मागणी केली आहे. तसेच ज्या कंपन्यांनी सोलर यंत्रणा बसविल्या आहेत त्यांनी त्वरित क्लेम मंजूर करून नवीन सोलर पॅनल बसवून द्यावेत, अशी मागणी गोपीवाडा येथील शेतकºयांकडून करण्यात येत आहे.